मुक्तिदायी राजकारण व डॉ. आंबेडकरांचे धर्मचिंतन -डॉ. यशवंत सुमंत (March 1999)

                          १९९२ मध्ये धर्मांध शक्तींनी बाबरी मशीद उध्वस्त केल्यावर, धर्म, धर्मचिकित्सा याबद्दल फेरमांडणी सुरू झाली आहे. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्मचिकित्सा आणि सामाजिक व राजकीय परिवर्तनाशी सुसंगत असा ‘धम्मा’ चा विचार यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे, मुक्तिदायी राजकारण व धर्मचिकित्सा यांची सांगड घालणारे हे टिपण.

                                       आधुनिक भारतातील सर्वच प्रमुख राजकीय विचारवंतांनी भारतीय समाजातील जडणघणीतील धर्म आणि जातीसंस्था या दोन महत्वाच्या घटकांना हात घालूनच आपापल्या राजकीय विचारांची आणि व्यूहांची मांडणी केलेली आहे.डॉ आंबेडकर हेही यास अपवाद नाहीत. त्यामुळे बाबासाहेबांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचे समग्र आकलन करुन घेताना त्यांचे धर्मविषयक चिंतन अभ्यासणे अगत्याचे ठरते. कारण त्यांचे धर्माविषयीचे विचार हा आधुनिक भारतातील आणि विशेषतः विसाव्या शतकातील भारतातील राजकीय चर्चा विश्वाचाच एक अविभाज्य भाग होता. हे चर्चाविश्व उपेक्षून डॉ.आंबेडकरांच्या धर्माषियक चिंतनाचे आकलन करुन घेणे नुसतेच अपुरे नव्हे तर विपर्यस्तही ठरण्याची शक्यता आहे.
                                    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मचिंतन तीन टप्प्यांमध्ये समजावून घ्यावे लागते. सर्वसाधारणपणे असा एक समज दिसून येतो की आंबेडकरांचे धर्मचिंतन म्हणजे त्यांचे त्यांचे नवबौध्द-दर्शन हे होय आणि त्याचे बायबल म्हणजे बुध्द अँड हीज धम्म’ हे होय. बुध्द अँड हीज धम्म’ ही आंबेडकरांच्या धर्माविषयक चिंतनाचीच नव्हे तर एकूण आंबेडकरवादाचीच प्रधान संहिता आहे हे खरेच. त्यांची धर्माविषयीची ध्येयदृष्टी याच त्यांच्या अलौकीक ग्रंथात व्यक्त झाली आहे. या ध्येयदृष्टीच्या प्रकाशात आंबेडकर एकूणच धर्मसंस्थेबद्दल काय म्हणतात, भारतातील महत्त्वाच्या धर्मसंप्रदायाबद्दल काय म्हणतात, धर्माचे मानवी जीवनातील स्थान कोणते याही प्रश्नांची आपण जेव्हा चर्चा करु तेव्हाच आंबेडकरांचे धर्मचिंतन सम्यकपणे आपण पाहू.
                     धर्मचिकित्सा- आंबेडकर हे नुसतेच आंग्लविद्याविभूषितनव्हते तर राजनीतिशास्त्र, इतिहास, कायदा, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या सामाजिक शास्त्रांचे गाढे अभ्यासक होते. धर्म हे माणसातील अविवेकाचे द्योतक आहे अशी कोरडी बुध्दिप्रामाण्यवादी भूमिका आंबेडकरांनी कधीच घेतली नाही. सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासामुळे आंबेडकरांची धर्माविषयक दृष्टी अधिक कल्पक व प्रगल्भ बनली होती. एक महत्त्वाची सामाजिक संस्था म्हणून ते धर्म संस्थेचा विचार करीत होते. विविध मानवी समाजात धर्माचा उदय कसा झाला, त्या धर्माचे प्रकार किती याची आंबेडकरांनी इतिहासवादी भूमिकेतून चिकित्सा केली आहे.

          धर्माचे मानवी जीवनातील महत्त्व त्यांनी पुरेपूर ओळखून घेतले होते आणि म्हणूनच धर्माविषयी उच्छेदवादी भूमिका ते घेत नाहीत. पण हे करत असतानाच धर्मसंस्थेचे स्वयंभू आणि स्वयंसिध्द पावित्र्यही त्यांनी कधी मान्य केले नाही. धर्म ही दैवी घटना नसून मनुष्य निर्मिती संस्था आहे आणि तिला जे पावित्र्य प्राप्त झाले केही माणसानेच बहाल केले आहे. या पावित्र्याचे स्त्रोत कोणते हे पाहणे म्हणजेच इतिहासवादी भूमिकेतून धर्म समजावून घेणे होय. आंबेडकरांनी जगभरच्या धर्मांचे जे परिशीलन केले ते याच मूमिकेतून. म्हणूनच धर्माचे तत्त्वज्ञान, धर्म संस्थांची निर्मिती, धर्माचे कर्मकांड, धर्मविधी, धर्माने केलेले शोषण किंवा शोषणास दिलेली मूक संमती वा सर्व बाबींची ते निर्भीडपणे चिकित्सा करतात.

                                 धर्म व धर्मसंस्थेचा इतिहासवादी भूमिकेतून विचार करताना आंबेडकरांनी धर्म म्हणजे धर्मशास्त्र असा अर्थ घेतला आहे. धर्मशास्त्राचे दोन प्रकार संभवतात. एक नैसर्गिक धर्मशास्त्र आणि दोन साक्षात्कारी धर्मशास्त्र. डॉआंबेडकरांच्या मते ही दोन्ही धर्मशास्त्रे परस्परविरोधी नसून परस्परांना मदत करणारीच आहेत. नैसर्गिक धर्मशास्त्रानुसार ईश्वर व दैवी सत्ता हा सृष्टीचाच एक अविभाज्य घटक आहे. या भूमिकेतूनच नैसर्गिक धर्मशास्त्राने तीन सिध्दांत पुढे केले आहेत. (१) ईश्वर अस्तित्वात आहे आणि तो या सृष्टीचा व या विश्वाचा स्रष्टा आहे. (२) सृष्टीतील प्रत्येक घटनेवर त्याची सत्ता चालते आणि त्याच्या नैतिक सत्तेनुसार ईश्वर मानवी जीवनावर आपली सत्ता चालवतो. या दृष्टीने पाहता या दोन धर्मशास्त्रांत मूलगामी असा फरक नाही. ही दोन्ही धर्मशास्त्रे ईश्वराचे अस्तित्व, त्याची सृष्टीवरील नियामक सत्ता आणि मानवी समाजाचे नैतीक नियमन या तीन गोष्टी मानतात. त्यामुळेच “धर्म ही दैवी शासनाची आदर्श योजना सांगणारी व त्यानुसार समाजव्यवस्था घडवुन माणसाचे नैतिक जीवन नियमित करणारी ही संस्था आहे.” अशी आंबेडकरांनी धर्माची व्याख्या केली आहे.
                           अशा या धर्माची घटना घडते कशी? धर्माची ही घटना पहात असताना धर्मसंस्थेतील बदल लक्षात घेतले पाहिजेत असे डॉ.आंबेडकर यांचे म्हणणे आहे. धर्मसंस्थेत होणारे बदल दोन प्रकारचे असतात. (१) बाह्य बदल(२) अंतर्गत बदल धर्मसंस्थेशी संबंधित बाह्य बदल हे धर्मसत्तेची कक्षा व अधिकार क्षेत्र किती असावे याच्याशी संबंधित असतात. विज्ञानपूर्व काळात धर्मसत्तेने मानवी जीवन संपूर्ण व्यापले होते. पण विज्ञान क्रांतीने धर्माचे हे साम्राज्य उद्ध्वस्त केले. कोपर्निकसने धर्मसत्तेपासून खगोल शास्त्र मुक्त केले. डार्विनप्रणीतत उत्क्रांतिवादाने भूगर्भशास्त्र व जीवशास्त्राची सुटका झाली. आंबेडकर म्हणतात. “धर्माच्या बाबतीत विज्ञानाने क्रांती घडवून आणली त्यामुळे विचार स्वातंत्र्याची प्रस्थापना झाली. समाज आत्मनिर्भर झाला. माणसे निर्भय झाली.” आंबेडकरांच्या मते वाढत्या ऐहिकीकरणामुळे माणसाची सृष्टी व समाजावरील सत्ता निर्णायक होत गेली व शास्त्रज्ञच नव्हते तर धर्मशील व्यक्तींनाही हे पटले की धर्माने सांगितलेल्या कित्येक गोष्टी निरर्थक होत्या. टाकाऊ होत्या आणि खऱ्या धर्म जीवनासही मारक होत्या.
                      धर्माचा सामाजिक प्रभाव- मात्र धर्मसंबंधीच्या या बाह्य क्रांतीने मानवी जीवनातून धर्माचे समूळ निर्मूलन झाले असेनाही. विज्ञानाच्या क्रांतीमुळे धर्माचे सर्वव्यापी क्षेत्र आक्रसले, संकुचित झाले इतकेच ! एक सामाजिक शक्ती म्हणून धर्म हा अद्यापही समाज जीवनात प्रभावीपणे वावरताना दिसतो. धर्माची ही सत्ता, प्रभाव समजून घेण्यासाठी आंबेडकर धर्मातील अंतर्गत बदल’ काय झाले याची मीमांसा करतात. रानटी, आदमी टोळ्याच्या धर्मापासून सुसंस्कृत समाजातील धर्मापर्यंत धर्माचे झालेले संक्रमण हा दुसरा टप्पा होय.
                          आंबेडकरांच्या मते आदिम समाजाचा धर्म हा मुख्यत्वे माणसाच्या ऐहीक जीवनाशी आणि ते जीवन टिकवण्याशी संबंधित होता. म्हणूनच आदिम धर्मातील जवळपास सर्वच विधी हे मानवी जीवनातील संघर्षमय टप्प्यांशी निगडीत असलेले दिसतात या सर्व टप्प्यांवर माणसाला शारीरिक वा मानसिक पातळीवर एक प्रकारचा जीवघेणा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष सुकर व्हावा तसेच माणसाचे जीवन सुरक्षित रहावे म्हणून आदिम समाजातील मारसाने जादुटोणे, मंत्र, तंत्र, गंडे-दोरे, बळीची प्रथा या सारखे यातुविधी शोधून काढले. आंबेडकर म्हणतात की धर्माचा उदय हा यातुविधीत नसून तो माणसाच्या जीवनधारणेत व समाजधारणेच्या स्वभावसिध्द संकल्पात आहे.         

                    जसजसे जीवन हे अधिक सुरक्षित होत जाईल तसतसे यातुविधी व त्याला चिकटलेली धर्मकल्पना नष्ट होत जाईल. आदिम सामाजाच्या धर्माची प्रमुख अशी दोन वैशिष्ट्ये आंबेडकरांनी नमूद केली आहेत. आदिम सामाजाच्या धर्मात ईश्वर संकल्पना नव्हती. आणि धर्म हा नैतिकतेशी संबंधित नव्हता आदिम समाजाजीही नीती होती पण ती धर्मापासून स्वतंत्र अशी होती. जीवन धारणेसाठी धर्माने जन्म, विवाह, मृत्यू या संबंधीचे संस्कारविधी करावेत आणि समाजधारणेसाठी समाजाने नीती नियम घालून द्यावेत अशी ही विभागणी होती. अर्थात या दोन्हीचे प्रयोजन एकच होते. आणि ते म्हणजे मानवी जीवनाची सुरक्षितता व सातत्य टिकवणे हे होय.
                     मग ईश्वरनिष्ठ धर्म आणि नैतिकतेचा अन्योन्य संबंध कधी प्रस्थापीत झाला? आंबेडकर म्हणतात, आदिम समाजात वीरपूजेची किंवा विभूतीपूजेची जी प्रथा होती त्यातून ईश्वराची संकल्पना विकसित झाली व ईश्वरवादीधर्म उदयास आला. तसेच जीवनाचा स्रष्टा कोण या विषयी जेव्हा तत्वचिंतन सुरु झाले तेव्हा त्यातून निर्मिकवाद निर्माण झाला. धर्मामध्ये झालेले हे दुसरे परिवर्तन होते. आणि याच टप्प्यावर धर्म हा ईश्वराशी व ईश्वराच्या नीतीशी निगडित झाला. आंबेडकर म्हणतात “सुसंस्कृत समाजात ईश्वर हा धर्माचा केंद्राबिंदू झाला आणि धर्माने नीतीची जागा घेतली.” याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा समाजात नैतिक, मूल्यात्मक संघर्ष निर्माण झाले तेव्हा तेव्हा माणसाला धर्माशीच दोन हात करावे लागले आहेत आणि भविष्यातही ते करावे लागतील धर्माचे स्वागत वा निषेध हा येथून पुढे नैतिकतेच्या संदर्भातच होत रहाणार ही आंबेडकरांची भूमिका आहे.
                            प्राचीन समाजाकडून आधुनिक समाजाकडे जे मानवी जीवनाचे संक्रमण झाले त्यातूनही माणसाच्या धर्मविषयक धारणात आमूलाग्र बदल झाला. हे धर्मांतर्गत असे दुसरे महत्त्वाचे परिवर्तन होते. देवं आणि त्याचे अनुयायी यांच्यातील संबंध हे रक्तसंबंधावर आधारीत होते. देवाचे पितृत्व हे जैविक, प्रत्यक्ष असे होते. आणि म्हणूनच प्राचीन समाजातील बंधुभाव जैविक स्वरुपाचा होता.प्राचीन समाजातील देव हे विश्वात्मक नव्हते. ते त्या त्या समाजाचे होते. माणसा प्रमाणेच त्यांना राग, लोभ, मत्सर हे विकार होते.
आधुनिक समाजाच्या उदयाबरोबर देवतांची जागा सर्वात्मक ईश्वराने घेतली. ईश्वर हा समाजातीत झाला. तो अखिल मानवतेचा, सृष्टीचा नियंता झाला आणि म्हणूनच माणसाने परस्परांशी कसे वागावे याचे निर्बंधही त्याने घालून दिले. त्या निर्बंधानुसार जगणे हेच जीवनातील श्रेयस ठरले.
                          अशा या धर्माची चिकित्सा कोणत्या मूल्यांच्या आधारे करावयाची? सर्वच धर्म सारखेच चांगले आहेत आणि त्यात भेदभाव करण्याची गरज नाही अशी एक भूमिका तुलनात्मक धर्मशास्त्राच्या अभयासकांनी घेतली होती. आंबेडरांना ही भूमिका घातक वाटते. त्यांच्यामते या भूमिकेतून सर्वच धर्माची भलावण होण्याची शक्यता आहे. तेव्हा या भूमिकेतून धर्माची चिकित्सा समाधानकारकपणे होऊ शकत नाही.

              त्या ऐवजी धर्म आणि नीतीची एकरुपता झालेल्या धर्माला त्यानेपुरस्कृत केलेल्या नैतिक ध्येयांच्या संदर्भातच प्रश्न विचारले पाहिजेत. मानवतावादी नैतिकतेच्या दृष्टीने त्या त्या धर्माची चिकित्सा केली पाहिजे. मानवतावादी नैतिकतेने ‘न्याय’ या मूल्याचा पुरस्कार केला आहे. आंबेडकर म्हणतात या न्यायाच्या कसोटीवरच धर्मचिकित्सा झाली पाहिजे. न्यायाच्या विचार म्हरजे इतरांचा विचार हा समतेचा विचार आणि इतर आपल्या प्रमाणेच असतील तर आपल्या सारखेच इतरांनाही स्वातंत्र्य हवे असा त्यांचा विचार त्यात होतो. म्हणजेच न्याय हे मूल्य मानले तर स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये त्यात येतात. म्हणून बाबासाहबे या मूल्याच्या आधारेच म्हरजेच पर्यायाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्याच्या आधारे धर्माचे तत्वज्ञान, धर्मसंस्था व तिचा व्यवहार याची चिकित्सा सुरू करु इच्छीतात. आंबेडकरांची ही भूमिका उपयुक्तवादी नाही.
                       हिंदुधर्माची समीक्षा – आंबेडकरांच्या धर्मचिंतनातील दुसरा महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी केलेल्या हिंदू धर्माची समीक्षा होय. हिंदूधर्म हे एक मोठे कोडे आहे. Riddles in Hindunismमध्ये हिंदू म्हणून एकाद्यास ओळखणे हे कसे गुंतागुंतीचे वकठिण काम आहे. याचा उहापोह बाबासाहेबांनी पहिल्या टिपणात केला आहे. पण असे असले तरी इर्मशास्त्रांना प्रवर्तीत केलेला धर्म या अर्थाने हिंदू धर्म हाही एक स्वत:ची स्वतंत्र मूल्यदृष्टी असलेला, त्यानुसार समाजाची धारणा करणारा, समाजाचे नैतिक नियमन करणारा, यहुदी, इस्लाम वा ख्रिश्चानिटीप्रमाणेच ‘पॉझिटिव्ह रिलीजन आहे.’ अशी आंबेडकरांनी भूमिका घेतली आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे अशी न्या.रानडे, गांधी, विनोबा यांनी भूमिका घेतलेली आहे. आंबेडकरांनी सनातन धर्म आणि ‘प्रवर्तित धर्म’ अशी वर्गवारी केली आहे.

                   अशा अवस्थेत ‘सनातन’ म्हणून घेणाऱ्या धर्माचा नेमका गाभा कोणता,  त्याची व्यवच्छेदक लक्षणे कोरती हे सांगणे अवघड होऊन बसते. त्यामुळे हिंदु धर्म हा सनातन धर्म आहे असे म्हणणाऱ्यांबरोबर अर्थपूर्ण चर्चा, युक्तिवाद करणे अवघड बनते. आंबेडकरांनी या आपत्तीतून सर्वांनाच सोडवले आहे. तयांनी हिंदू धर्म हा ख्रिस्ती व इस्लाम धर्माप्रमाणेच प्रवर्तित’ धर्म आहे हे प्रथम प्रस्थापित केले.
                            परिणामत: माणसामाणसातील हार्दिकता नष्ट होते. माणसे भौगोलिकदृष्ट्या जवळ येतात. पण मनाने परस्परांपासून दुरावली जातात. राष्ट्रभावना ही मुळातच नकारात्मक असल्याने केवळ आपत्तीच्या प्रसंगीच ती परस्परांबद्दलचा जिव्हाळा, ऐक्यभाव निर्माण करते एरवी समाजातील क्षुद्र हितसंबंध बंधुत्वावर नेहमीच मात करीत असतात. जमातवाद, प्रदेशवाद, जातिवाद, भाषावाद, वंशवाद हा नित्याचा अनुभव बनतो, दंडशक्तीच्या बलावर ऐक्य टिकवण्याच्या प्रयत्नास अंगभूत मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत परात्म झलेल्या व्यक्तीस बंधुत्वाचा, सहोदरत्वाचा प्रत्यय येणार कसा? त्यासाठी उच्च नैतिक पुरस्कार करणारा धर्म हवा. आंबेडकरांना तो बुध्द विचारात सापडला.
                                          बुध्दविचार विवेक स्वातंत्र्य सांगतो, समता सांगतो. भ्रातुभाव सांगतो. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही आधुनिक नागरी समाजाची मूल्यत्रयी बुध्दाने कधीच घोषित केली आहे. पण बुध्द तिथेच थांबत नाही. तो करुणा, प्रज्ञा, मअत्री वशील याही मूल्यांचा उदघोष करतो. तो ब्राम्हणधर्माप्रमाणे निव्वळ हिंसाप्रधान नाही तसाच तो जैनधर्मीयांप्रमाणे अतिरेकी अहिंसेचाही पुरस्कार करीत नाही. बुध्द हा परलोक नाकारतो म्हणून तो ऐहिक आहे. तो प्रज्ञास्वातंत्र्य सांगतो म्हणून सांप्रदायिक नाही. तो ‘दु:ख’ म्हणजे दारिद्र्य विषमता आणि म्हणूनच शोषणाच्या विरोधात आहे.

                      शोषणमुक्त समाजाचे ध्येय ज्या प्रागतिक विचारधारांनी स्वीकारले त्यांना बुध्दस्वीकारावाच लागेल. याच संदर्भात मार्क्सवादाचे शोषणमुक्त समाजाचे व सुखी समाजाचे नैतिक ध्येय आणिबुध्दाचे दु:ख निवारण्याचे नैतिक ध्येय हे सारखेच आहे असे आंबेडकर ‘बुध्दा ऑर कार्लमार्क्स’ या त्यांच्या भाषणात सांगतात. आधुनिक भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेल्या शोषण, चंगळवाद, हिंसा, दारिद्रय, विषमता या सर्व दुखण्यांच्या विरोधात मार्क्स उभा राहिला. भारताील बुध्दविचारही या दुखण्यांच्या विरोधोत उभा राहू शकातो हा आंबेडकरांचा दृढ विश्वास होता.

                  म्हणूनच बुध्दाला मार्क्सचा पर्याय म्हणून ते उभा करीत नाहीत तर मार्क्सचा सहोदर म्हणून उभा करतात. आज नागरी समाज, राष्ट्र राज्य, याही पलीकडे जाऊन कम्यूनिटॅरिअन समाजाची’ स्वप्ने आपण पहात अहोत. आधुनिक सामाजातील दुखण्यांवर आपण उपाय शोधत आहोत. मार्क्सने सांगितलेल्या Classless Society चा प्रयोग झाला लोकशाहीच्या कल्याणकारी राज्याचा प्रयोग झाला.

                     Small is Beautiful चे युरोपमध्ये प्रयोग चालू आहेत. गांधींच्या ग्रामराज्याचा विचारच जिथे इथल्या बुध्दीजीवी वर्गास समजला नाही तिथे policy makers तो काय म्हणून राबवणार. या संदर्भात आंबेडकरांचा ‘धम्म’ विचार हा कम्यूनिटॅरिअन समाजाला ब्लू प्रिंट होऊ शकतो. पण तो धर्माच्या प्रांगणातून सामाजिक व राजकीय आखाड्यात उतरला पाहिजे. देशाच्या परिवर्तनवादी राजकारणाच्या ऐरणीवर उच्चरवात मांडला गेला पाहिजे. तरच आंबेडकरांचे धर्मचिंतन मुक्तीवादी राजकरणाचे हत्यार म्हणून वापरता येईल अन्यथा येथील मोक्षवाले त्याच्याच आधारे स्वत:च्याच मुक्तीचा विचार करण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत.

दलप्रमुख एस. एम. –भाईवैद्य (पूर्व प्रसिद्धी- १९८९ राष्ट्र सेवा दल पत्रिका)


 
                     सन १९४० मध्ये काँग्रेस भवनात पाहिलेले एस. एम. आपले जीवन इतके व्यापून टाकतील असे स्वप्नांतही वाटायचे कारण नव्हते. माझे बालमित्र कृष्णा कापसे व मी नेहमी काँग्रेस भवनमधील कार्यक्रमाला जात असू. टिळक पुण्यतिथीला त्यावर्षी एस. एम. जोशी वक्ते होते व त्यांनी भाषणात अत्यंत आग्रहपूर्वक लोकमान्य टिळकांच्या मंत्राचा उत्तरार्ध मनावर ठसविला होता. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ एवढेच म्हणून थांबू नका, तर पुढील भाग ‘आणि तो मी मिळविणारच’ हा जोरात म्हणा असे त्यांनी सांगितले होते. वरील जोर तेव्हापासूनच होता.

               त्या मंतरलेल्या दिवसात १९४३ मध्ये सहजपणेच आम्ही राष्ट्र सेवा दलाकडे खेचलो गेलो आणि लक्षात आले की, कर्पूरगौर वर्ण असलेले, धोतर-कोट-टोपी असा खादीचा वेष परिधान करणारे ते पुढारी आमचे दलप्रमुख असून देशभर भूमिगत संचार करीत विध्वंसक चळवळीचे नेतृत्व करीत आहेत. प्रत्यक्ष समोर दिसत नसूनही ते आमचे स्फूर्तिदाते होते आणि भूमिगत चळवळीतील त्यांच्या रोमहर्षक कथा हा आमचा जिव्हाळ्याचा विषय होता. एकदा कळले की ते पुण्यात येऊन भूमिगत कार्य करणारांना मार्गदर्शन करून गेले. अशाच कथा अच्युतराव पटवर्धन यांच्यासंबंधी सेवा दल शाखांवर सांगितल्या जात. आमचे शाखाप्रमुख श्री. आप्पासाहेब मायदेव हे तर एस. एम. व व अच्युतराव या दोघांना जवळून ओळखतयाचा आम्हाला अभिमान वाटे ! पुढे एस. एम. इमामसाहेबांच्या वेषात पकडले गेले आणि सुटल्यावर बेचाळीसच्या वीरांचे प्रचंड सत्कार झाले. आम्ही त्या वीरांच्या व्यक्तिमत्वाने भारावूनच गेलेले होतो.
 
बौद्धिक म्हणजे प्रत्येकाशी संवाद
 
                       पुढे शिबिरांतून, बैठकांमधून एस. एम. ची बौद्धिके ऐकत गेलो. एस. एम. चे विचार हे पौष्टिक टॉनिकसारखे असत. मला आठवते की, जागतिक पार्श्वभूमी, देशाचे प्रश्न, समाजवादी चळवळीचे प्रयत्न आणि अनुषंगाने राष्ट्र सेवा दल सैनिकाचे कर्तव्य या गोष्टी सोप्या खुसखुशीत करून ते समजावून देत. एस. एम. चे बौद्धिक म्हणजे समोर बसलेल्या प्रत्येकाशी संवादच असे. अनेकवेळा हास्यांची कारंजी उडवीत, खेळकर-पणाने तर कधी सात्त्विक संतापाने उसळून लालबुंद होऊन ते आपले विश्लेषण पुढे मांडीत. दोन जागतिक गटांमधील तणाव, आफ्रिकेतील अपूर्ण राहिलेले स्वातंत्र्य लढे, समतेचे प्रश्न, गांधीजींनंतर काँग्रेसचे झालेले पतन, जेपी-लोहिया यांचे चळवळीचे प्रयत्न, स्वयंसेवक संघटनांचे महत्त्व, नवसमाजनिर्मितीची कल्पना आणि प्रत्येक सैनिकाचे उद्दिष्टानुसार आचरण अशा अनेक पैलूवर ते प्रकाश पाडीत.

                    सेवा दल ही केवळ लाठी-काठी फिरविणारी-सेवा न बनता त्यातून समतेच्या लढाईत बिनीच्या तुकडीमध्ये लढणारे, जाति-धर्म भेदातीत भारतीय राष्ट्रवादमानणारे, समाजवादी शीलाचे सैनिक निर्माण व्हावेत ही त्यांची अपेक्षा असे. परंतु ही अपेक्षा व्यक्त करताना व्यावहारिक, दैनंदिन जीवनातील उदाहरणे घेऊन ते बोलत. हुंड्याविरुद्ध बोलताना आई-वडिलांना दुखवू नये म्हणून हुंडा स्वीकारणाऱ्या तरुणांची ते रेवडी उडवीत. चैनीसाठी किंवा हव्या त्या मुलीशी लग्न करण्यासाठी आईबाप दुखावतील हा विचार मनात येत नाही. मग हुंड्याच्या वेळीच कसा येतो? असे हसत ते विचारीत. तुम्ही ध्येयासाठी पागल व्हा, पदवीधर झाल्याबरोबर किमान एक वर्ष समाजाला द्या असे सांगत. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे ते उपदेश करीत आहेत असे चुकूनही वाटत नसे.

                      आधीमधी खास कोकणी अनुनासिकातील शब्द यायचा व हास्याचा धबधबा कोसळायचा. एस. एम. दलप्रमुख असताना स्वतःबद्दल दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न कधी केला नाही, आपणही एक सैनिक आहोत अशाच पद्धतीने ते सर्वांशी वागत. त्यामुळे एखादा खटयाळ शब्दही सहज खपून जाई. स्वामी विवेकानंद हुक्का पीत, असे म्हटल्याबरोबर काहींना पावित्र्यभंग झाला असे वाटले. एस. एम. नी स्वतःबद्दल अशी भावना निर्माणच होऊ दिली नाही. ते सांसारिक, मुलाबाळांवर प्रेम करणारे परंतु विचार व कर्तृत्व याने श्रेष्ठ वाटतं. प्रेमभंगामुळे निराश होऊन सामाजिक काम सोडणाराबद्दल ते एकदा बौद्धिकात सहज म्हणाले की, ‘अरे एकाच प्रेमभंगामुळे तुमची प्रेमाची गंगा कशी आटून जाते ? प्रेमगंगेत पुन्हा पुन्हा डुब्या मारता आल्या पाहिजेत. अशामुळे दलप्रमुख आण्णांच्याबद्दल प्रत्येक तरुण स्त्री-पुरुष सैनिकांना आपलेपणाच वाटत असे. अशाच खेळकर भाषेत सैनिकांना ते लोकशाही, समाजवाद, धर्मातीत राष्ट्रवाद इ० संकल्पनासमजावून देत.
 
चळवळींचे अग्रणी

                     एस. एम. दलप्रमुख असले तरी समाजवादी चळवळीतील व महाराष्ट्रीय राजकारणातील त्यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण होते व त्याची सैनिकांना पूर्ण कल्पना होती. काँग्रेसमधून समाजवादी पक्षाने बाहेर येणे, महागाईविरोधात व अन्य प्रश्नावर लढे लढविणे, शे. का. पक्षाशी खंडाळा करार करणे इ० घटनांमध्ये ते स्वाभाविकच अग्रभागी होते. त्यांच्यामुळे साने गुरुजी, आ. जावडेकर, आ. नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, डॉ. लोहिया यांचे विचार व मोठेपण सैनिकांना समजत असे.

                      ही श्रेष्ठ मंडळीही एस. एम. बद्दल जो सहज आपलेपणा दाखवीत तो ध्यानी येई आणि एस. एम. बद्दलचा आदरभाव दुणावे. त्याबरोबरच सामान्य कार्यकर्त्यांबाबत व त्यांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी एस. एम. जो जिव्हाळा दाखवीत तो विलक्षण हृदयस्पर्शी असे. मुंढव्याचा सेवा दल कार्यकर्ता हणमंता भंडारी युनियनचेही काम करी व युनियन वैरामुळेच विरोधकांनी त्याचा खून केला. साने गुरुजींच्या अंत्ययात्रेत एस. एम. जसे अश्रू ढाळत होते तसेच हणमंताच्या संबंध अंत्ययात्रेत रडत होते. आवाबेन कर्करोगाने अकाली गेली. अण्णा स्फुदून स्फुदून म्हणाले, ‘आवाबेन, तू रांग मोडून पुढे का बरे गेलीस? ‘ स्वाभाविकच प्रत्येक सेवा दल सैनिक त्यांना एस. एम. ऐवजी अण्णा या नावानेच संबोधित असे. हजारो कार्यकर्ते आजही त्यांना पितृसमान मानत आले आहेत.
                              साने गुरुजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ ‘साने गुरुजी सेवा पथक’ स्थापन करण्याची घोषणा करून एस. एम. नी एक वर्ष देण्यासाठी आवाहन केले. इतकेच नव्हे तर स्वतः प्रथम आपले नाव सेवा पथकात दाखल केले. त्यानंतर पन्नासजणांच्या पथकाला घेऊन एस. एम. वर्षभरखेडोपाडी रस्ते बांधणे, विहिरी खोदणे, तळी साफ करणे अशी कामे करीत राहिले. देहूरोडजवळील तळवडे गावच्या लोकांना वाटले की, खाकी पोषाखातील सरकारी माणसेच मोलावारी काम करीत आहेत. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी दुरावा राखला व सैनिकांना उपाशी राहण्याची पाळी आली. एस. एम. नी घरोघरी माधुकरी मागून गावकऱ्यांचे हृदयपरिवर्तन केले व त्यांचे सहकार्य मिळविले. दलप्रमुखच बरोबर असल्यामुळे सेवा पथकाची चळवळ थोड्याच अवधीत महाराष्ट्रभर पसरली.
                        त्यावेळी ‘देशके लिये एक घंटा’ हा नारा जेपींनी दिलेला होता. राष्ट्र सेवा दलाने हडपसरला एक भव्य मेळावा आयोजित केला आणि मांजरीच्या सुभाष सामुदायिक शेतीवर श्रमदान आयोजित केले व श्रमप्रतिष्ठेचे महत्व सैनिकांच्या मनात ठसविले. या श्रमदानामध्ये दलप्रमुख एस. एम. टिकाव घेऊन आघाडीवर होते. नानासाहेब तर हाफपँटमध्येच श्रमदानासाठी आले होते. जेपींनीही श्रमदान केले.

प्रेरणादायी नेतृत्व
 

                        आज ज्यांना सर्वत्र मान्यता आहे अशा अनेक मान्यवरांना एस. एम. चे नेतृत्व प्रेरणादायी वाटत आलेले आहे. सर्वश्री मधु लिमये, मधु दंडवते, पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, कवी वसंत बापट, यदुनाथ थत्ते, बागाईतकर, हमीद दलवाई, बाबा आढाव, अनुताई लिमये, प्रा. वर्दै, प्रा. ग. प्र. प्रधान, स्मिता पाटील, निळू फुले, राम नगरकर, डॉ. राम ताकवले, बापू काळदाते, पन्नालाल सुराणा, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते अशी कितीतरी नावे सांगावीत. अक्षरशः असंख्यांची मने एस. एम. नी भारावून टाकली. त्यांनी नानासाहेबांच्या सहकार्याने तरुणांची पिढीच घडविली आहे. दलप्रमुख एस. एम. जोशी हा एस. एम. च्या जीवनातील केवळ एक पैलू असला तरी तो दैदिप्यमान आहे यात शंका नाही.

सेवा दल विचार विहार : उद्याची सकाळ ज्यांच्या स्वप्नातून साकार होणार आहे – सदाशिव अमरापूरकर (February 1991)


 
(राष्ट्र सेवा दल ही मातृसंस्था मानणारी छात्रभारती ही एक स्वायत्त संघटना आहे. राष्ट्र सेवा दलाची वैचारिक भूमिका मानणारी ही महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची संघटना सात आठ वर्षात महाराष्ट्रात सर्वपरिचित झाली. डिसेंबर १९९० मध्ये मिरज येथे छात्रभारतीचे सातवे अधिवेशन पार पडले. त्याचे उद्घाटन करताना प्रसिद्ध अभिनेते श्री. सदाशिव अमरापूरकर वांनी केलेले भाषण राष्ट्र सेवा दल सैनिकांनाही उद्बोधक वाटेल.)
 
                     राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या चारही दिशांतून भारताच्या भाळी केवळ अंधारच दाटून येतोय, अशी आजची परिस्थिती आहे. आणि जर उगवणार र सेलच, तर उद्याचा सूर्य ज्यांच्या डोळ्यांतून उगवणार आहे. उद्याची सकाळ ज्यांच्या स्वप्नातून साकार होणार आहे ..अशा माझ्या तरुण मित्रांशी, संवाद करण्याची अमूल्य संधी मला दिल्यावद्दल, मी छात्रभारतीचा अत्यंत आभारी आहे.
                     मित्रांनो ! मी आताच म्हटलं की, सूर्य उगवतो… सूर्य मावळतो…पण हे भेद असतात ते आपल्यासाठी… वास्तविक सूर्य असतो आपल्याच जागी स्थिर…काही मूल्ये अशीच स्थिर…शाश्वत असतात…आणि त्यातलं एक मानवी जीवनातील समृद्ध असं लेणं आहे…ते म्हणजे तारुण्य…आपल्या देशाची खरी धनदौलत… आमची तरुण पिढी. आणि या तरुण पिढीने संघटित होऊन आपली सत्शक्ती जर पणाला लावायची ठरवली, तर खरोखर आपल्या देशामध्ये दाही दिशांतून दाटूनआलेला जो काळोख आहे तो दूर व्हायला निश्चितच काहीच काळ लागणार नाही, अशी मला खात्री वाटते.
                         मित्रांनो ! वास्तविक मी नट…त्यातही खलनायक खोटा वेश…खोटा आवेश, यातून मला नाखुशीने अनेक दुष्कृत्ये करावी लागतात. पण आज मुद्दाम रुपेरी पडदा बाजूला सारून एक माणूस म्हणून मी तुमच्यात आलोय.
‘छात्रभारती’ या नावात विशाल संदर्भ आहे. छात्र म्हणजे विद्यार्थी आणि खरा कलावंत तर आजन्म विद्यार्थीच असतो… आणि भारती…भारतीयत्वाचं नातं कोण नाकारू शकेल? तेव्हा छात्रवृत्ती आणि भारतीयत्वाचा वारसा घेऊन तुम्ही जसे इथे जमला आहात, तसाच मी इथे आलो आहे.
                                   सहज म्हणून माझ्या आधी इथे व्यासपीठावर येऊन गेलेल्या माननीय व्यक्तींची मी नावे वाचली आणि माझ्यावर एक दडपण आलं. मी त्यांच्या तोलामोलाचंमार्गदर्शन कसं काय करू शकणार ? खरं सांगायचं… तर तुमच्या नव्हे…माझ्याच स्वार्थातून मी इथे आलोय. जसं खूप वापरलेलं वस्त्र असतं…मग आपण ते पाण्यात खळबळून घेतो…तसंच चाकोरीत चालून चालून शिणलेलं हे मन तारुण्याच्या खळाळत्या निर्झरामध्ये आकंठ डुंबवून घ्यावं, स्वच्छ व्हावं, उत्साहित व्हावं, म्हणून मी तुमच्यामध्ये आलोय.
                      मित्रांनो! तुमच्यामध्ये उदंड आकांक्षा आहे, प्रचंड शक्ती आहे, पण…पण तुम्हाला समजावून घेऊन तुमच्या शक्तीचा, तुमच्या इच्छेचा, सत्कार्यासाठी विनियोग करणाऱ्या फार थोड्या संस्था आहेत. खरे तर धर्मकारण, राजकारण, अर्थकारण यांची दुष्टचक्रे चालवण्यासाठी इंधन म्हणून आज तरुणांच्या शक्तीचा वापर केला जात आहे. आजची मूल्ये अशी झाली आहेत की, माणसाच्या शक्तीचे मोजमाप करायचे ते • तराजूच्या काटयावर, माणसाची शक्ती बंदीस्त ठेवायची ती तिजोरीच्या कुलुपात, तिला नाचवायचे ते तलवारीच्या तालावर, तिला झुलवायचे ते भगव्या, हिरव्या किंवा निळया झेंड्यासमोर आणि तिला झुकवायचे ते तख्ताच्या समोर.
                          हा तुमच्या शक्तीचा उपयोग प्रत्येक क्षेत्रामध्ये होत आहे आणि अशा वेळेला विज्ञाननिष्ठ समाजवादाचा उद्घोष करणारी आपली छात्रभारती हे. खरोखरच फार मोठं आशास्थान आहे.
                      इथे या अधिवेशनाच्या निमित्ताने जे काही विचारमंथन होणार आहे, त्यामध्ये अतिशय जिव्हाळ्याचे असे तीन विषय तुम्ही चर्चेला घेणार आहात. धर्मांधता, शिक्षण आणि नुकताच वादग्रस्त ठरलेला मंडल आयोग. व्यक्तीशः मला या तीनही विषयात अखंड असा एक दुवा दिसतो. धर्म त्यानंतर शिक्षण आणि त्यातून सामाजिक विषमतेवरती प्रहार, असा हा मला एकमेकांना जोडणारा दुवा इथे दिसलो.
खरोखर आज आमच्या देशामध्ये धर्म आहे काय? धर्माची व्याख्या करण्यात आली की, धारण करतो तो धर्म…आजचा आमचा धर्म सामान्य माणसाची फक्त पाचावर धारण बसवतो. साध्या सरळ माणसाला तर धर्मशक्तीचा आधार वाटण्याऐवजी उबग येऊ लागला आहे. अहो, जो माणसामाणसात भेद निर्माण करतो… भिती निर्माण करतो… तो कसला धर्म !
खरे तर आपली सत्ता अबाधित रहावी आणि सामान्य माणसाचं अज्ञान कायम रहावं म्हणून अत्यंत धूर्त अशा सत्ताधिशांनी निर्माण केलेला धर्माचा बागुलबुवा आज आमच्या समाजाच्या मानेवर बसलेला आहे. तो डोळेच उघडू देत नाही म्हणून सर्वप्रथम विज्ञानाचा स्वीकार करायला हवा.
                  छात्रभारतीच्या मूलभूत संकल्पनेमध्येच असे म्हटलेले आहे की, विज्ञान युगातील समतावादी विद्यार्थांचे हे व्यासपीठ आहे. तेव्हा आपला धर्म हा विज्ञानधर्म आहे. ही वैज्ञानिक दृष्टी जर लाभायची असेल तर व्यापक शिक्षणाशिवाय तरी अन्य उपाय नाही. आणि म्हणून त्या दृष्टीने जर आपल्या देशातील स्थिती पाहिली तर फार भयावह आहे. एवढा खंडप्राय देश, पण इथल्या साक्षरतेचे प्रमाण हे अन्य अनेक देशांच्या तुलनेने निश्चितच कमी आहे. सध्यातरी प्राथमिक शिक्षणाचा पाया व्यापक करणे, बळकट करणे ही एक प्रदीर्घ काळ चालणारी, नव्हे अखंड चालणारी मोहीम हाती घेतली पाहिजे.
                           शिक्षणातून विज्ञानधर्माचा प्रसार झाला तर मंडल आयोग हा योग्य की अयोग्य? त्यात राजकीय रंग किती? हे असले प्रश्न उद्भवणारच नाहीत. कारण आपण मानवतावाद मान्य केला आहे. या समाजामध्ये सर्वांना समाजातील तळागाळाच्या घटकांना समान संधी मिळाली पाहिजे…हे कोण आणि कोणत्या आधारावर नाकारू शकेल ? एका ऐतिहासिक अपराधातून सुटण्याची संधी. सुयोग असा हा मंडल आयोग आहे. त्याला अकारण राजकीय रंग देऊन जातीय तेढ वाढवण्याचे प्रयत्न करणे म्हणजे मूळ प्रश्नाकडे स्वार्थांध दृष्टीने दुर्लक्ष करण्यासारखे आहे. पिढ्यान् पिढ्या ज्यांना किमान मानवी हक्कांपासून, किमान मानवी गरजांपासून वंचित ठेवण्यात आलेले आहे, त्यांना या समाजामध्ये पायाचे दगड म्हणून चिणून आपण कसे काय समतेचे मंदिर उभारणार आहोत? मला असा विश्वास वाटतो की, कोणत्याही राजकीय प्रचाराला आणि धार्मिक प्रसाराला बळी न जाता छात्रभारतीच्या प्रत्येक सदस्याने या प्रश्नाचे जर मर्म ओळखून घेतले तर त्याला हे मंडल आयोगाचे मानवतावादी उत्तर केवळ मान्यच होणार नाही, तर त्यानुसार तो निश्चित कृती करण्यास तयार होईल.
असे म्हणतात की, कितीही उंच पर्वत शिखर जिंकायचे असेल तर सुरुवात आपल्या पावलांशी करावी लागते. पहिले पाऊल हे सर्वांत महत्त्वाचे असते आणि म्हणून तुम्हा तरुणांनी, ज्यामध्ये श्रमिक आहेत, ग्रामीण आहेत, गरीब आहेत, अशा विद्यार्थ्यांना काय करता येईल?
मला असे वाटते की, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, ज्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहात, त्यामध्येदेखील अनेक समस्या आहेत. ह्या समस्यांकडे तुम्ही अतिशय जागरूकतेने, अतिशय सावधानतेने लक्ष दिले पाहिजे.
                        एक लक्षात घ्या, प्रवाहाच्या सुरवातीलाच जर पाणी गढूळ झालं तर संपूर्ण जलाशय शुद्ध राहण्याची अपेक्षाच करता येत नाही आणि म्हणून तुमच्या या संस्कारशील वयामध्येच जर तुमच्यावरती काही चुकीचे ग्रह लादण्यात आले तर नंतरच्या आयुष्यामध्ये तुमची नजर निवळलेली राहूच शकत नाही. म्हणून सर्वप्रथम आपले हे जे शिक्षण क्षेत्र आहे, की ज्यामधून सर्व समाजाची धारणा होत असते, त्या शिक्षण क्षेत्रातील ज्या समस्या आहेत, त्यांच्याशी तुम्ही सामना केला पाहिजे आणि हा कसा करणार? तुम्हाला तुमचे वैयक्तिक प्रश्न असतात. इच्छा असूनही कित्येकदा मार्ग सापडत नाही…मार्ग आहे…तो म्हणजे संघटित होण्याचा… आणि एक होऊन आपल्या समस्यांना आव्हान द्यायचा ..सतत एक लक्षात ठेवायचे…आपल्या आयुष्यामध्ये जो अभाव असतो, त्याने कधीही हताश व्हायचे नाही. सोय नसते…सुविधा नसतात…संधी नसते…पैसे नसतात…नाहीचा पाढा तरुणांनी वाचायचा नाही, उलट आपण असे म्हणायचे, अरे, आयुष्याने ज्याला काहीही दिलेले नाही, त्या तरुणाला आयुष्याने एक फार मोठी गोष्ट दिलेली आहे, आणि ती म्हणजे आव्हान. तरुण असशील…तर आपलं सारं बळ एकवटून तू हे आव्हान स्विकारशील.
                            अशा स्वरूपाची प्रेरणा, आणि अशा स्वरूपाची शक्ती…ही तुम्हाला छात्रभारती देत आहे, ही खरोखर आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
                 वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून तुम्ही सारेजण इथे एकत्र झालेले आहात. याआधी परस्परांची ओळखही नसेल… तरीदेखील तुम्हां सर्वांना इथे एकत्र आणणारा…एक करणारा…असा हा फार मोठा दुवा आहे. तुम्ही सारे तरुण आहात, आणि तुमच्यावरच आमच्या आकांक्षा केंद्रीत झालेल्या आहेत.
                    या अधिवेशनाच्या निमित्ताने जे काही विचारमंथन होईल, त्यातून तुम्हाला जे काही सुत्र सापडेल ते परत गेल्यावर आपल्या दैनंदिन जीवनाच्या धबडग्यात तुम्ही मुळीच विसरू नका.
किंबहुना कोणताही विचार…कोणताही विचार कितीही श्रेष्ट असला…तरी तो अर्धाच असतो… आचाराची जोड मिळाल्यानंतरच तो पूर्ण होतो…आणि म्हणून इथे तुम्हाला जे जे वाटत असेल…तसं वागण्याची तयारी ठेवा.
                      विज्ञानाची दृष्टी स्विकारा…नव्या युगाचा धर्म हा विज्ञानधर्म आहे हे लक्षात घ्या. जरतपश्चर्या करायचीच असेल तर ती शिक्षणाच्या क्षेत्रात करा… आणि समतेची जोपासना करा.
तुमच्यामधे येऊन हे काही…प्रतिष्ठीत नसतील… पण प्रामाणिक विचार मांडण्याची जी संधी मला छात्रभारतीने दिली आहे, त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो.
उद्घाटन झालेले आहे…आरंभ झालेला आहे. आरंभशूर असण्याबद्दल भारतीयांची खूप ख्याती आहे, तुम्ही मात्र त्याला सन्माननीय अपवाद ठरायचंय.
हे सर्व बोलत असताना उपदेश करणं सोपं असतं याची मला जाणीव आहे, आणि आजच्या                           

                 जगात तर खरोखर तरुणाची अवस्था खवळलेल्या समुद्रात तारु घेऊन जाणाऱ्या एकाकी आणि धाडशी अशा दर्यावर्दीची असते. अथांग समुद्र आणि त्यात उसळणाऱ्या अक्राळविक्राळ लाटा यांचा त्याला मुकाबला करायचा असतो. मी इतकेच सांगू शकेन की ज्याप्रमाणे क्षितीजापर्यंत सर्वत्र पाणी दिसत असतानासुद्धा खलाशी आपला मार्ग शोधून काढतो , कारण त्याच्याजवळ चुंबकसुई असते, आणि ती सदैव त्याला एक विशिष्ट दिशा दाखवत असते. तुम्हा तरुणांच्या मनामध्येसुद्धा सदैव असा एक मॅग्नेटिक कंपास असतो, असला पाहिजे आणि त्याचं नाव तुमचा विवेक…तुमच्या विवेकाची सुई सदैव तुम्हाला या समुद्रात योग्यच दिशा दाखवीत राहील.
तुमच्यासमोर असंख्य समस्या आहेत. शिक्षणक्षेत्रामध्ये तर अशी अनस्था आलेली आहे की, अभ्यास करून उत्तीर्ण होणे हा प्रतिगामी मार्ग ठरलेला आहे.

                        एकमेव आमच्या ह्या बेकारी निर्माण करणाऱ्या कारखान्यामध्ये काही दिवसांनी अशी अवस्था येईल… की जशी औषधाच्या बाटलीवर एक्सपायरी डेट असते …तशी डिग्रीवरतीसुद्धा काही दिवसांनी एक्सपायरी डेट लिहिण्याची…केवळ दिल्याचीच फक्त नव्हे तर एक्सपायरी डेट देण्याचीसुद्धा व्यवस्था करावी लागेल. व्हॅलीड अप टू….
इकडे बाहेर आसाम, पंजाब, काश्मीर ही राज्ये राजकीय वणव्यामध्ये होरपळून निघत आहेत. दक्षिण विरुद्ध उत्तर हा सामना भारतात सदैव रंगत आलेला आहे. इंग्लीश की हिंदी हा प्रश्न आपल्याला अजूनही सोडवता आलेला नाही. इतकंच काय तर आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हवा तसा वाढदिवसही साजरा करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागलेय…मग राज्यातल्या अडचणींची तर बातच सोडा…
ज्ञान मिळवणं हा प्रत्येक मानवी प्राण्याचा मूलभूत हक्क आहे…तर त्यावरही जबरदस्त कॅपीटेशन फी आकारली जात आहे.
                   कुठेही आदर्शाचा आढळ नाही. स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या पिढीला म. गांधींसारखे नेते म्हणजे लहान मुलांसाठी कल्पनेने रचलेल्या परीकथा वाटतात. कारण सध्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक संबंधाचं जे हिडीस रूप आपण पहातोय, जो नंगानाच “आपण पहातोय…सत्तेसाठी चाललेली जी केविलवाणी धडपड पहातोय. त्यात हे गांधींच्या विचारांचे वारस म्हणविणारे सर्व राजकीय पक्षातील. लोक आपले हात धुवून घेताहेत. आपले खिसे भरताहेत.
                    मग का नाही आजच्या तरुणांना गांधींचे विचार आणि आचार काल्पनिक वाटणार? कारण त्यांचेअनुयायी म्हणवणारे वेगळेच प्रदर्शन मांडून बसलेत.
या सर्वांमुळे एक प्रकारचे हताशपण, नैराश्य आपल्या मनात येणे अगदी स्वाभाविक आहे.
अर्जुनालाही ते आलं होतं. पण त्याला निदान गीता सांगायला श्रीकृष्ण तरी होता आज आपल्याला अर्जुनाचं उदाहरण उपयोगी नाही. आपल्याला एकलव्य व्हायला हवं. अंगठा गमावला तरी उरातला आवेश कायम ठेवून आपल्याला आपली विद्या मिळवायची आहे.
मला तरी वाटतं की, तरुणांची भूमिका समाजाच्या पात्रामध्ये तुरटीसारखी असली पाहिजे. तुरटी जर पाण्यात टाकली तर स्वतः गढूळ होत नाही, तिच्यामुळे पाणी निवळतं. तसं आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाऊ, तिथला अनाचार, अत्याचार, भ्रष्टाचार याने आपण मलीन व्हायचं कारण नाही, किंबहुना आपण त्याचा प्रतिकार करायचाय. आणि तो प्रतिकार करायची तयारी म्हणजे तुमच्या मनामध्ये एक निश्चित भूमिका आधी तयार झाली पाहिजे.

                    मी कोण आहे? मी भारतीय आहे. माझा धर्म कोणता? विज्ञान हा माझा धर्म आहे. माझं कर्म काय ? विद्यार्जन करणं हे माझं कर्म आहे. माझं साध्य काय? सामाजिक समता हे माझं साध्य आहे.आणि यासाठी मला जे जे करावं लागेल ते कोणत्याही रूढीला, रिवाजाला, पंथाला, जातीला, वर्गाला शरण न जाता मी माझ्या मनामध्ये जी चुंबकसुई आहे… विवेकबुद्धीची…तिची टोचणी प्रमाण मानून तिने दाखवलेल्या दिशेनेच जाईन.
यश येईल अथवा न येईल, पण मी माझ्याच मार्गावरून चालणार, एवढा जरी निश्चय या अधिवेशनाच्या निमित्ताने आपण केला, तरीसुद्धा खन्याअर्थी आरंभ नव्हे, शुभारंभ झाला, असे मानता येईल.
धन्यवाद !

सेवा दल विचार विहार: राष्ट्राच्या मूल्यशिक्षणासाठी गांधीविचारांची गरज- प्रा. चंद्रकांत पाटगांवकर (पूर्वप्रसिद्धी- फेब्रु १९९८ दल पत्रिका)

               आज भारतात सर्वत्र बोकाळलेल्या भ्रष्टाचार, हिंसाचार, बलात्कार, भोगवाद, चंगळवाद यासारख्या दोषांचे निर्मूलन करण्यासाठी राष्ट्रांच्या ‘मूल्यशिक्षणाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे.’ हे मूल्यशिक्षणाचे संस्कार महात्मा गांधी प्रणित एकादशव्रतांच्या आधारे होऊ शकतील. व्यक्तिगत जीवनाप्रमाणे सार्वजनिक जीवनातही ही एकादशमूल्ये आचरणात आणली पाहिजेत असा गांधीजींचा आग्रह होता. शाळाशाळांतून मूल्यशिक्षणाच्या तासामध्ये या व्रतांचे संस्कार नव्या पिढीवरही करता येतील.
                         व्रत या शब्दप्रयोगामुळे हे काहीतरी धार्मिक कर्मकांड आहे. अशी प्रथमदर्शनी प्रतिक्रिया निर्माण होणे साहजिक आहे. साधू संन्यासी होण्यासाठी ही व्रते ठिक आहेत; सर्वसामान्य गृहस्थाश्रमी आणि प्रापंचिक लोकांसाठी या व्रतांचे आचरण अव्यवहार्य आहे. अशीही लोकांची समजूत आहे. पण ‘आज देशांतील भयानक वातावरण पाहिल्यानंतर सर्वसामान्य लोकांनाही या गांधींच्या व्रताचे शिक्षण आवश्यक असल्याची खात्री पटते आहे.
                     महात्मा गांधींच्या हत्येमुळे त्यांचे शरीर नष्ट झाले असले तरी त्यांचे विचार नष्ट झालेले नाहीत. भारतातल्याच नव्हे तर जगातल्या मानवजातीला महात्मा गांधीजींच्या विचारांच्या प्रकाशात वाटचाल करावी लागणार आहे.
                       महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनी त्यांच पुण्यस्मरण करणं म्हणजे त्यांच्याअजरामर विचारांचे पुण्यस्मरण करणं! ना. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्माजींचे गुरु! महात्माजी हे आचार्य विनोबा भावेंचे गुरु! राष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या या तीनही पिढ्यातील नेत्यांनी राष्ट्रापुढं व्यक्तिगत शुद्धचारित्र्याचे महान् आदर्श ठेवले आहेत. शुद्ध साध्यांसाठी साधनेही शुद्धच असली पाहिजेत असा साधन शुचितेचा आग्रह या नेत्यांनी धरला. तत्पूर्वी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील सार्वजनिक जीवनांत नीतिमूल्यांचा जोरदार आग्रह धरला जात नव्हता. प्रेमात,प्रेमात, युद्धात आणि राजकारणांत सारं काही क्षम्य असत अस समर्थन केलं जात असे! ना. गोखले यांनी मात्र राजकारणांच्या आध्यात्मिकरणाचा मंत्र दिला! नैतिक मूल्यांचा आग्रह धरला.

               गांधीजींजवर ना. गोखल्यांच्या या उपदेशाचा खोल परिणाम झाला. सार्वजनिक ध्येयप्राप्तीसाठी साध्य साधन विवेकाचा आग्रह गांधीजींनी हिरीरीनं धरला. सार्वजनिक कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या वैयक्तिक जीवनात विचार, उच्चार आणि आचारांच्या शुद्धतेवर भर दिला. त्यासाठी त्यांच्या आश्रमात राहणाऱ्या प्रत्येकासाठी त्यांनी एकादशव्रताचे पालन अनिवार्य ठरवले. आचार्य विनोबांनी एका सूत्रामध्ये या अकरा व्रतांचे वर्णन केले –
              “अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह,
               सर्वधर्मी समानत्व, सर्वत्र भयवर्जन,
               शरीरश्रम, अस्वाद, स्वदेशी, स्पर्शभावना!”
               ही ‘एकादश’ सेवाची नमत्वे’ व्रत निश्चये !

व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशी दोन्ही स्तरावरील जीवन जगत असताना प्रत्येकाने या एकादश व्रताचे पालन केले पाहिजे असा आग्रह महात्मा गांधीजींनी धरला!
                        व्रत घेणे हे निर्बलतेचे द्योतक नाही तर ते सबलतेचे सूचक आहे! अमुक एक गोष्ट करणे उचित आहे, तर ती केलीच पाहिजे, याचेच नाव व्रत आहे. या व्रतपालनामध्ये सामर्थ्य आहे. अशी प्रस्तावना करून गांधीजींनी या व्रतांचा क्रम घोषित करताना ‘सत्य’ या व्रतास पहिले सर्वश्रेष्ठ स्थान घोषित केले. ‘असतो मा सद्गमय!’ ही आपली प्राचीन प्रार्थना आहे! असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमृताकडे मला ने अशी आपली ही प्रार्थना आहे. म्हणूनच भारतीय संविधानाने भारताचे बोधवाक्य म्हणून ‘सत्यम् एव जयते!’ हे घोषवाक्य स्वीकारले आहे.

                    यासाठीच न्यायालयात ‘सत्य तेच बोलेन, असत्य बोलणार नाही.’ असे शपथेवर सांगावे लागते. महात्मा गांधींनी आपल्या आत्मचरित्राला ‘माझे सत्याचे प्रयोग’ असे नाव दिले. आपले स्वतःचे व्यक्तिगत जीवन आणि सार्वजनिक जीवन म्हणजे या ‘सत्यशोधनाची प्रयोगशाळा त्यांनी मानली. या सत्याचा आग्रह धरण्यासाठी त्यांनी ‘सत्याग्रह’ केले. वैयक्तिक सत्याग्रह केले. सामुदायिक सत्याग्रह केले. दक्षिण आफ्रिकेत या सत्याग्रहाचा जन्म झाला. भारतात या ‘सत्याग्रह’ तंत्राचा विकास झाला. या सत्यांच्या आग्रहासाठी क्लेश सहन करण्याची शक्ती सत्याग्रही वीरांमध्ये निर्माण केली. शांतिप्रिय सत्याग्रहींनी लाठीमार आणि गोळीबार सहन केले. शांतिप्रिय सत्याग्रहींनी लाठीमार आणि गोळीबार सहन केले.

                 भारतीय स्वातंत्र्याचा संग्राम या सत्याग्रहामुळे पुढे सरकला. भारताबाहेरही अमेरिकेतील नीग्रो नेते डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांनी वर्णभेदाविरोधी लढ्यांत या शांततामय सत्याह तंत्राचाच अवलंब केला. जगातील पिडितांना शोषितांना आणि दलितांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शांततामय ‘सत्याग्रहा’चे अभिनव शस्त्र महात्मा गांधींनी उपलब्ध करून दिले. सुरुवातीच्या काळात गांधीजी म्हणत असत, ‘ईश्वर हा सत्य आहे. अखेरी अखेरीस ते म्हणू लागले, ‘सत्य हाच ईश्वर आहे.’
                       एकादश व्रतामधले दुसरे तितकेच महत्त्वाचे व्रत म्हणजे ‘अहिंसा’! अ-हिंसा याचा अर्थ न हिंसा! हिंसा नाही. हा नकारात्मक अभावात्मक अर्थ झाला. याचा सकारात्मक आवात्मक अर्थ म्हणजे ‘प्रेम’! या प्रेमापोटीच कुणाची हिंसा करायची नाही. हत्या करायची नाही. हत्या जशी शस्त्राने करायची नाही तशी शब्दानेही करायची नाही. वाणी, लेखणी, किंवा करणीत कुणालाही दुखवायचं नाही. इतका व्यापक अर्थ अहिंसा या तत्वाचा आहे.

              सत्य आणि अहिंसा ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अस गांधीजी म्हणत असत. सत्याग्रही हा अहिंसकच असला पाहजे असं ते म्हणत असत. हिंसेनं केलेली सत्याची प्रतिष्ठापना चिरंतन ठरणार नाही. हिंसेनं मिळालेल स्वराज्य टिकणार नाही. परकीयांनी शस्त्राच्या बळानं आपल स्वराज्य हिरावून घेतलं. पुन्हा आपण शस्त्राच्या बळावर ते परत मिळविल तर त्याहून अधिक प्रभावी अशा शस्त्रबळान परकीय शक्ती त्यावर ताबा मिळवू शकतील. म्हणजे या शस्त्रबळाच्या संघर्षांना अंत उरणार नाही.

                 याउलट अहिंसेने, प्रेमाने, आत्मबलाने मिळवलेले स्वराज्य कधीही हिरावून घेतले जाणार नाही. कारण या अहिंसक लढ्यात सूडाची भावना उरणार नाही. जिंकणारे आणि हरणारे दोघेही शत्रू न राहता मित्र बनतील. आजवर जगाच सूत्र होत, War to end War! युद्धाच्या अंतातुनी, युद्धाचे बीज फुटे.’ असाच अनुभव आजवरच्या सशस्त्र व हिंसक महायुद्धाचा जगानं सोसला आहे. १९१४ ते १९१८ या पहिल्या विश्वयुद्धाच्या अंती व्हर्सायचा तह झाला खरा. परंतु व्हर्सायच्या या तथाकथित ‘शांततातहातच’ दुसऱ्या विश्वयुद्धाची बीजे होती. व्हर्सायच्या अपमानकारक तहाचा सूड घेणयाची प्रतिज्ञा करूनच हिटलरचा उदय झाला आणि १९३९ साली दुसरे विश्वयुद्ध होऊन प्रचंड नरसंहार घडून आला.                                                 रशिया आणि अमेरिका या दोन जागतिक महासंतांनीजागितक शांततेसाठी अण्वस्त्रांचा नाश करण्याचा निर्णय घेतला. जगाला गांधींचा मार्गच स्वीकारावा लागला.
                      अहिंसा या तत्वामध्ये हिंसेपेक्षाही अधिक शौर्य दडलेले असते याचे स्पष्टीकरण गांधीजींनी अत्यंत मार्मिकपणे केले आहे. गांधींना भ्याडाची अहिंसा मान्य नव्हती. शूराची अहिंसा हवी होती. वेळप्रसंगी भ्याडाच्या अहिंसेपेक्षा मी शूराची हिंसा नाइलाजान स्वीकारीन असं ते म्हणाले होते. परंतु तशी वेळच येऊ न देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले. अहिंसा या तत्वामध्ये हिंसेप्रमाणेच मिलिटन्सी म्हणजे शौर्य असते. हे समजावताना ते उदाहरण देतात शस्त्र घेऊन लढणारा सैनिक आणि शस्त्र न घेता लढणारा सैनिक यांचे. सशस्त्र सैनिक कुठपर्यंत लढत राहतो? जोपर्यंत त्याच्या जवळ दारूगोळा किंवा काडतुसे आहेत तो पर्यंत. दारूगोळ्याचा साठा संपला, काडतुसे संपली की ‘आर्मस् डाऊन अँड हँडस् अप’ हथियार नीचे और हाथ ऊपर म्हणजे शस्त्रे खाली ठेऊन हात वर करणे आणि शरण जाणे.

                याउलट निःशस्त्र सैनिकाचा दारूगोळा किंवा काडतुसे संपण्याचा प्रश्नच नाही. त्याचे शौर्य शस्त्रावर अवलंबून नाही. त्याचे शौर्य शस्त्रासापेक्ष नाही तर शस्त्र निरपेक्ष आहे. अंतःकरणातल्या सामर्थ्यावर अंतरिक निर्धाराच्या शक्तीवर तो लढत असतो. मिठाच्या सत्याग्रहाचे वेळी लाठीमार गोळीबार झाले तरी स्वयंसेवक मागे हटले नाहीत.

                 जखमी झाले, घायाळ झाले, काही मृत्युमुखी पडले पण हटले नाहीत, हरले नाहीत. त्यांचे शौर्य आणि त्यांची ‘निर्भयता ही बाह्य बंदुकांसारख्या शस्त्रांवर अवलंबून नव्हती. शस्त्रबळापेक्षा त्यांचे मनोबळ आंतरिक बळ हे अजिंक्य ठरलं. सरहद्द प्रांतातले धिप्पाड शूर पठाणांची अहिंसक सेना सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखानांनी उभी केली. अमेरिकेतील नीग्रोनेता डॉ. मार्टिन ल्यूथर किंग यांच्यानेतृत्वाखाली ‘वुई शाल ओव्हरकम’ ही घोषणा देत वर्णभेदांविरुद्ध शांततामय (लाँग पीसमार्च) दोन्ही मोर्चा उभारून यशस्वी केला.
                               सत्य आणि अहिंसा ही व्रते एकादशव्रतातील सूर्यचंद्राप्रमाणे मानली जातात. इतर ग्रह ताऱ्यांप्रमाणे बाकीची व्रते गणली जातात. असंग्रह किंवा अपरिग्रह हे तिसरे व्रत. धन किंवा द्रव्याचा संग्रह आवश्यकतेपेक्षा अधिक करू नये असे गांधींजी म्हणत असत. सत्यशोधक आणि अहिंसक व्यक्ती संग्रह करू शकत नाही. ते म्हणतात, “असंग्रह आणि अस्तेय ही व्रते परस्परसंबंधित मानली पाहिजेत. वस्तुतः चोरलेला नसला तरी अनावश्यक संग्रह चोरीच्या मालासारखाच ठरतो. जर सारी माणसं गरजेपुरता संग्रह करू लागतील तर कुणालाही कशाचीही दहात पडणार नाही आणि सारेजण संतोषाने राहतील.”
                           जिथे संग्रह आहे तिथ चोरी आलीच. संग्रह पाहूनच गरजेपोटी चोराला चोरी करण्याची इच्छा होते म्हणून प्रॉपर्टी इज थेफ्ट असा कार्ल मार्क्स म्हणाला होता. हा विचार आणि अनावश्यकसंग्रह हा चोरीचा माल होतो हा विचार यामध्ये विलक्षण साम्य आहे. गांधी आणि मार्क्स या दोन्ही महापुरुषांचे विचार किती मिळतेजुळते वाटतात. Great men think alike महामानवांचे विचार कसे एकसारखे आढळतात, हेच खरं.
                   अस्तेय हे चौथे व्रत. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. दुसऱ्याची वस्तु त्याच्या संमतिविना घेणे म्हणजे चोरी. परंतु एवढाच मर्यादित अर्थ गांधीजींना पुरेसा वाटत नाही. गांधीजी या अस्तेय शब्दाचा अर्थ अधिक विस्तृत आणि व्यापक मानताना लिहितात, ‘अस्तेय याच्याही पुढे आहे. एखाद्या वस्तूची गरज नसताना ज्याच्या ताब्यात ती वस्तु आहे त्यांच्या संमतीने जरी घेतली तरी ती चोरीच ठरेल.अनावश्यक वस्तू कुणीही घेऊ नये. या जगातील बहुतेक समस्या ‘अस्तेय’ व्रताच्या भंगामुळेच निर्माण झालेल्या आहेत.
                    अभय हे पाचवे व्रत. भयरहित स्थिती म्हणजे अभय. घाबरट किंवा पळपुटी व्यक्ति अहिंसेचे पालन करू शकणार नाही. शस्त्रहीन व्यक्ती शस्त्रधारी व्यक्तीपेक्षा निर्भय असू शकते. गांधीजी म्हणतात, “मरणाचे भय, चोराचे भय यासारख्या बाह्य भयांपासून जशी मुक्ती हवी तशी कामक्रोध आदि आंतरिक षड्रिपुंपासूनही मुक्ति मिळवायला हवी. अंतर्बाह्य भयांपासून मुक्ति मिळवणारा साधकच खराखुरा निभर्य बनू शकेल.’

             ‘स्वदेशी’ हे सहावे व्रत. स्वदेश म्हणजे आपला देश. आपल्या देशबांधवांनी केलेला माल म्हणजे स्वदेशी माल. गांधीजी म्हणतात, ‘ज्या व्रताच्या सहज पालनामुळे हिंदुस्थानांतील कोट्यावधी देशबांधवांचे प्राण जगू शकतील असा कोणता स्वदेशी धर्म आहे? या प्रश्नाच्या उत्तरात मला चरखा किंवा खादी मिळाली. “भारताची लोकसंख्या आज ८० कोटींच्या वर गेली आहे. यापैकी ४० टक्के म्हणजे ३२ कोटी लोक आज दारिद्र्य रेषेखाली जगत आहेत. त्याच्या घरची चूल दोन वेळा पेटू शकत नाही.

                    प्रत्येक भारतीय नागरिकाने कपड्याचा फक्त एक सेट जरी खादीचा वापरायचे ठरवले तर दोन कोटी लोकांना रोजगार मिळून त्यांना दोन वेळची भाकरी मिळेल हे खादीचे अर्थशास्त्र आहे. म्हणून परदेशी मालाच्या तुलनेत स्वदेशी माल घ्यावा. स्वदेशी यंत्रमागाच्या तुलनेत स्वदेशी हातमागाचा माल घ्यावा. यंत्रोद्योग आणि हस्तोद्योग या दोन्ही उद्योगांना संरक्षण मिळेल अशी आपली ग्राहकसंस्कृती आपण विकसित केली पाहिजे. चंगळवादी आणि उपभोगवादी ग्राहक संस्कृतीमुळे स्वदेशी उद्योग, ग्रामोद्योग हस्तोद्योग बंद पडून कोट्यावधी लोक बेकारीच्या खाईमध्ये ढकलले जात आहेत. लोकमान्य टिळकांनी आणि महात्मागांधीनी शिकवलेल्या स्वदेशी व्रताच्या पालनाची आज भारताला पुनः एकवार आवश्यकता निर्माण झाली आहे.
                                    स्पर्श-भावना म्हणजे अस्पृश्यता निवारण हे सातवे तत्व. “अस्पृश्यता हा ईश्वर आणि मानवता याविरुद्ध घोर अपराध आहे. आपल्या भारतीय समाजावरील तो कलंक आहे.” असं गांधीजी सांगत असत, जर आत्मा एक आहे, ईश्वर एक आहे तर आम्ही त्याची सर्व लेकरे समान आहोत. स्पृश्यअस्पृश्य किंवा उच्चनीच कोणी नाही. भारतीय संविधानाने अस्पृश्यता हा गुन्हा ठरवला आहे.
           सर्वधर्मसमभाव हे आठवे व्रत. गांधीजींच्या रोजच्या सायंप्रार्थनेत सर्वधर्मीय प्रार्थना ते म्हणत असत. ‘ईश्वर अल्ला तेरो नाम! रघुपतिराघव राजाराम!’ हा अभंग ते सामूहिक प्रार्थनेत. म्हणत असत. गांधीजी म्हणत, ‘भारतीय व्रतांमध्ये सहिष्णुता हे प्राचीनतम व्रत आहे परधर्म सहिष्णुता हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. यामुळे भारतीय संविधानाने हिंदू मुस्लिम शीख ईसाई इ. सर्व धर्मीय नागरिकांना धामक स्वातंत्रय बहाल केले आहे. प्रजासत्ताक भारत हा ‘अमर’ चा आहे, ‘अकबर’चा आहे आणि ‘अँथनी’चाही आहे.
                 शरीरश्रम हे नववे व्रत! शारीरिक श्रम म्हणजे अंगमेहनतीचे काम. इंग्रजी ‘ब्रेड लेबर’ या शब्दाच भाषांतर आहे. त्याचे शब्दशः भाषांतर होईल. भाकरी (साठी) श्रम!’ प्रत्येक मुख्य जिवंत राहण्यासाठी ‘भाकरी’ खात असतो. परंतु आपण भाकरीसाठी श्रम करतोच असे नाही. गांधीजी म्हणतात, भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात म्हटले आह की यज्ञ न करता खाणारा चोरीचे अन्न खातो! असा भयंकर शाप ‘अयज्ञ’ साठी दिलेला आहे. इथे यज्ञ याचा अर्थ शरीरश्रम किंवा भाकरीश्रम हाच शोभून दिसतो आणि माझ्यामते तोच अर्थ सांगूननिघतो. मेहनत मजदुरी न करणाऱ्याला भाकरी खाण्याचा काय अधिकार आहे? बायबल मध्ये म्हटले आहे, ‘स्वतःची भाकरी स्वतःचा घाम गाळून तू कमव आणि मगच खा!’

                अस्वाद हे दहावे व्रत! स्वाद म्हणजे रस. गरजेपुरतेच अन्न आपण घ्यावे. स्वादासाठी आपण ते खमंग रूचकर व चमचमीत करून गरजेपेक्षा जास्त घेत असतो. त्याची शरीराला गरज असत नाही. मोठमोठे ऋषिसुद्धा ‘स्वाद’ जिंकू शकलेले नाहीत असं सांगून गांधीजी पुढे म्हणतात, “औषध घेताना ज्याप्रमाणे ते स्वादिष्ट आहे की नाही’ याचा विचार न करता शरीराला त्याची आवश्यकता आहे हे जाणून योग्य प्रमाणात त्याचे सेवन आपण करतो, त्याचप्रमाणेच अन्नाच्या बाबतीत आपण वागले पाहिजे. माझा अनुभव असा आहे की अस्वाद व्रताचे पालन करण्यात यशस्वी झाल्यावर ब्रह्मचर्य व्रताचे पालन म्हणजे जननेंद्रियादींचा संयम अत्यंत सहजसाध्य होतो.’

                     ब्रह्मचर्य हे यापुढचे अखेरचे व अकरावे व्रत. ब्रह्मचर्य या शब्दाचा स्थूल अर्थ कामभोगादि विलास निषिद्ध मानणे. ब्रह्मचर्य व्रताचे पालन मन, वचन आणि कर्म अशा विविध मार्गांनी केले पाहिजे. हा संयम अत्यंत कठिण आहे यात शंका नाही. परंतु संयमाशिवाय सामर्थ्य नाही. गांधीजी म्हणतात, ‘कानांनी विकारोतेजक गोष्टी ऐकायच्या, डोळ्यांनी विकार उत्पन्न करणारी वस्तू पाहायची, जिभेने विकारोत्तेजक पदार्थांचा स्वाद घ्यायचा, हाताने विकार उत्पन्न करणाऱ्या वस्तूला स्पर्श करायचा आणि याउपरही जननेंद्रिय तेवढे ताब्यात ठेवण्याची इच्छा करणे म्हणजे आगीत हात घालून सुद्धा विस्तवाच्या फटक्यापासून बचाव करण्यासारखे आहे. म्हणूनच ब्रह्मचर्य म्हणजे सर्व इंद्रियावर विकारांवर नियंत्रण ठेवले पाहिजे.’

सेवा दल विचार विहार : मी भारतीय का आहे -डॉ. ना. य. डोळे (Jan 1991)

मी भारतीय का आहे ?
‘नाइलाजाने’ काही लोक सांगतील.
‘मागील जन्मीच्या कर्मानुसार’ असेही उत्तर काही लोक देतील.
‘अपघाताने’ हे उत्तर अधिक बरोबर ठरावे.
                 मी भारतीय का? याचे उत्तर म्हणजे मी भारतीय आईवडिलांच्या पोटी जन्मलो म्हणून. याच न्यायाने (किंवा अन्यायाने) मी कोणत्या तरी जातीत जन्मलो आणि ती जात मला कायमची चिकटते. कोणत्या तरी धर्मात जन्मलो म्हणून मी त्या धर्माचा ठरतो. मग मला कोणी तरी ‘गर्व से कहो’ म्हणायला शिकविते आणि मी म्हणतो. मला माहीत असते की, अपघाताने हा जन्म प्राप्त झाला आहे, यात गर्व बाळगण्यासारखे काही नाही.
खरे म्हणजे मी मानव असणे हासुद्धा एक अपघातच आहे. त्यामुळे माझ्या इन्सानपणाची सारखी आठवण करून देणारांचेही मला हसू येते. मी ससा, सुसर, हत्ती काहीही झालो असतो.
              तुम्हाला भारतीय असण्याबद्दल विशेष गर्व वाटत नाही, तर तुम्ही या देशातून दुसरीकडे चालते का होत नाही, असे कोणी मला विचारतील.
मला एका ब्राह्मण, हिंदू, महाराष्ट्रीय, भारतीय कुटुंबात जन्माला घालताना त्या सर्व शक्तीमान परमेश्वराने मला माझा चॉइस विचारला नव्हता. विचारला असता तर मी कदाचित दुसरे काही मागून घेतले असते. फुलपाखरू होणे मला आवडले असते.
तेव्हा मला न विचारता मला हा जन्म मिळाला. आता लोक विनाकारण त्रासदायक प्रश्न विचारतात की तुम्ही प्रथम कोण भारतीय की हिंदू ? महाराष्ट्रीय की भारतीय ? ब्राह्मण आहात की हिंदू?
                       इतरांना सुद्धा असेच प्रश्न विचारले जातात, असे मला समजले. पंजाबी, शीख, भारतीय, महाराष्ट्रीय मुसलमान अशा विविध साखळ्यात माणूस जन्मतो आणि त्याला आपण प्रथम कोण या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागते. मला हा प्रश्न आवडत नाही. ही सर्व विशेषणे मला न विचारता अगोदर लावण्यात आली आणि आता त्यांचा क्रम लावण्याची जबाबदारी माझ्यावर का? माझी जात, माझी भाषा, माझा धर्म, माझा देश यात डावे-उजवे कसे काय करणार? या बाबी एकमेकांच्या विरोधी आहेत का, हेच अजून मला निश्चित ठरविता आलेले नाही.
देश सोडून चालते होण्याचा प्रश्न तसाच राहिला. मला पाश्चिमात्य देशात राहणे आवडेल कारण तेथे कोणत्याच गोष्टीचा तुटवडा नसतो. खूप समृद्धी आहे. बेकारी नाही. ढोंगीपणा नाही. तुमच्या खासगी जीवनात, आवडी-निवडीत कोणी डोकावत नाही.
                    पण तिथे वर्णभेद आहे. शिवाय या सर्व देशांनी आता कायम राहू इच्छिणाऱ्यांवर काही निर्बंध घातले आहेत. माझ्यासारख्याला ते येऊ देणार नाहीत म्हणून मला हा देश सोडून जाता येत नाही. कम्युनिस्ट देशात किंवा आफ्रिकन देशात प्रयत्न केला तर प्रवेश परवाना मिळू शकेल, पण मग भारतात राहिले तर काय वाईट ?
                आता सहवासाने या देशावर प्रेमही जडले आहे. मी नायजेरियात जन्मलो असतो तर त्या देशावरही माझे प्रेम बसले असते असे मला वाटते. प्रेम करणे आणि आवडणे या दोन भिन्न गोष्टी आहेत.
                मी भारतीय आहे, त्याचा मला अभिमान आहे का? पूर्वजांनी जे करून ठेवले त्याचे श्रेय घेणे मला योग्य वाटत नाही. सध्या आपण जे काही करीत आहोत ते चांगले नाही. जमाखर्च काढला तर असेच म्हणावे लागेल की मी अभिमान बाळगावा अशा प्रकारचा मी भारतीय नाही. मी भारतीय आहे पण अभिमान बाळगावा असे माझ्या हातून काही घडलेले नाही. जेव्हा घडेल त्यावेळी अभिमानाने सांगेन.
                आपल्या देशातील विविधता मला आवडते. या विविधतेच्या हमीतच ऐक्याची गुरुकिल्ली आहे. काही लोक उगाचच एकच जात, एकच धर्म, एकच भाषा, एकच संस्कृती असा आग्रह धरतात. यामुळे देशातील संमिश्र संस्कृती धोक्यात येईल, अशी माझी खात्री आहे.
                     काही लोक आपल्या सर्व नागरिकांचे भारतीकरण केले पाहिजे म्हणतात. सर्वजण अगोदरच भारतीय असताना भारतीकरण कसे करणार? आणि मी तुमचे भारतीकरण करतो असे म्हणणारे तुम्ही कोण ?
दोनतीनदा परदेशी जाण्याचा योग आला. डोकेसांगत होते की काहीतरी युक्ती काढून परदेशी रहावे. खाण्यापिण्याची चंगळ होती म्हणून पोटही डोक्याला पाठिंबा देत होते. पण हृदय म्हणत होते की, चला परत आपल्या मायदेशी !
अपघाताने जन्म मिळाला. जात जशी न मागता मिळाली. तसा हा देशही न मागता माझी मातृभूमी बनला. धर्मही असाच चिकटला आणि भाषा आईकडून मिळाली. यात माझे काय ?
                     माझा विवाह झाला. मी मुलामुलींना जन्म दिला. त्यांचेही दिवाह झाले. त्यांनीही नव्या अर्भकांना दिला. यात अभिमान बाळगण्यासारखे काय आहे हे अजून माझ्या लक्षात येत नाही. माझी नातवंडेही पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारी साजरी करतात. वंदेमातरम्, जनगणमन म्हणतात. मराठीत बोलतात, स्वताला हिंदू समजतात. वगैरे.
                  पण हेही खरे की ते जर इंग्लंडमध्ये जन्मले असते तर गॉड सेव्ह द क्वीन, म्हंटले असते आणि युनियन जॅक त्यांचा राष्ट्रध्वज असता. भौतिक दृष्टया कदाचित त्यांचे जीवन इथल्यापेक्षा अधिक सुखी समृद्ध झाले असते. अपघाताने बिचा-यांना आमच्या घराण्यात जन्म मिळाला.
                      आईवडील-जात-धर्म-भाषा-प्रदेश-राज्य एकाचवेळी अपघाताने आपल्याला मिळते. मग कधीकधी आपल्याला असे सांगण्यात येते की, यातल्या सर्वच गोष्टी अपघातजन्य असल्या तरी काहींचा अभिमान बाळगावा, काहींचा गर्वाने उल्लेख करावा आणि काही लपवून ठेवाव्या. असे का करावे तेही कोणी नीट समजावून सांगत नाही. मग आपली फार फरफट होते.

सेवा दल विचार विहार :सावधान! -राजा मंगळवेढेकर (1989)

तरुण मित्रा,
           सध्या सगळीकडं धर्माचा बोलबाला फार आहे. धर्माचा गवगवा पुष्कळ आहे. धर्माची चर्चाही बरीच आहे. यामुळं काही लोक फुरफुरत्या बाह्यांच्या मस्तीत आहेत. मजेत आहेत. तर काही लोक चिंताग्रस्त बनलेले आहेत, काळजीत पडलेले आहेत !
धर्माची अलिकडच्या काळात, म्हणजे या तीस-पस्तीस वर्षांत, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर, अशी अतिरेकी भाषा कानावर येत नव्हती. वृत्तपत्रांमधून वाचायला मिळत नव्हती. मुळीच नव्हती, असं मला म्हणायचं नाही; ती होतीच! या काळात कधीमधी ती तीव्रपणानं उमटायची देखील. पण अलिकडच्या सातआठ वर्षांत ती पुनःश्च प्रखर झालेली दिसते !
                    स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी, स्वातंत्र्याचा लढा लढला जात असताना, परकीयांची सत्ता पिटाळून लावण्याचं आणि देश स्वतंत्र करण्याचं महान कार्य चालू असतानासुद्धा एका बाजून हिंदूस्थान हिंदूओंका!अशी गर्जना तर ‘लढके लेंगे पाकिस्तान !’ -अशी गर्जना दुसऱ्या बाजूनं उमटत होती. ही गर्जनाकार मंडळी स्वत:ला धार्मिक, धर्मनिष्ठ, धर्मरक्षक असंही छाती फुगवून, मुठी वळवून, डोळे विस्फारून त्वेषानं म्हणवून घेत होती.
परिणाम : स्वातंत्र्याबरोबरच भारताची फाळणी झाली. एकाची दोन राष्ट्रे झाली. स्वातंत्र्य कलंकित बनलं.
                            परवा डोंबिवलीला गेलो होतो. एका नातेवाईकाकडं उतरलो होतो. त्याच्याकडं गेलो. त्याच्या दारावर टकटक’ केलं. पण त्याआधीच त्याच्या दारावर चिटकवलेलं एक मोठया अक्षरातलं घोषणापत्रं दिसलं – ‘गर्वसे कहो हम हिन्दू है ! ‘- अशीच घोषणापत्रकं मला दारादारांवर, कित्येक दुकानांवर, स्टेशनावर, शाळांच्या भिंतींवर – ठिकठिकाणी चिकटवलेली दिसली. आता तर या घोषणेनं धमाल उडवून दिलेली आहे !
इकडं गर्वानं हिंदू फुगलेले आहेत, तर तिकडं पुन्हा एकदा देशाची खांडोळी करायला खलिस्तानवादी शीख आसुसलेले आहेत. रोज निरपराध लोकांना नियमानं, रतीब घालावा तसं, कंठस्नान घालत आहेत. तिकडं अयोद्धेला मंदिर-मस्जीदचा प्रश्न धगधगत आहे, तर इकडं अमेरिकेला धर्मप्रचारासाठी निघालेल्या जैन-साध्वींना त्या विमान-प्रवास करणार म्हणून जैन-धर्मनिष्ठ त्यांना विरोध करत आहेत. त्यांचा निषेध करत आहेत. त्यांची साध्वीपणाची वस्त्रं हिरावून घेत आहेत ! …
               मित्रा, तूही गोंधळून गेला असशील ! बावरूनगेला असशील! कदाचित धर्माच्या नावावर चाललेल्या या खेळानं तुझं तरुण मन गुदमरलेलंही असेल!
पण मित्रा, असा हडबडू-गडबडू नकोस. गुदमरू नकोस. तू तुझं मन स्वच्छ-मोकळं ठेव ! निर्मळ-सुंदर ठेव ! सर्व विचारांचं आस्थेनं स्वागत कर. त्यांना सामोरा जा. पण तू तुझ्या विचाराचं स्वरूप मात्र सतत, सदैव, निरंतर परिशुद्ध ठेव ! विचार तुझाच राहू दे ! विचार विचारच आहे! विचार अमक्याचा, विचार तमक्याचा,…म्हणून विचार जवळ करू नकोस!
धर्माच्या संदर्भात म्हणशील, तर ‘धर्म हा धर्मच असतो! ‘हेही लक्षात ठेव. धर्म जोडणारा असतो. तोडणारा नसतो. धर्म समावेशक असतो. आवेशक किंवा कोरडा उपदेशक नसतो. धर्म विचाराप्रमाणेच आचारात असतो. अधिक असतो.

               धर्म न्यायी असतो, नीतीमान असतोप्रेमळ असतो. हट्टाग्रही, अंध, द्वेषी, मत्सरी नसतो. धर्म नित्य प्रवाही असतो. सृजनात्मक असतो. गतीमान असतो. वैज्ञानिकही असतो.म्हणून तो धर्म ! धर्म धमच असतो, तो हिंदू नसतो. तो मुस्लीम नसतो. जैन नसतो. बौद्ध नसतो. शीख किंवा चिनही नसतो. धर्माचं जेव्हा असंबारसं’ केलं जातं आणि त्याच्यावर लेबल डकवलं जातं, तेव्हा धर्माचं मूळचं व्यापकपण आक्रसून गेलेलं असतं. धर्माची विशालता संकुचित झालेली असते. धर्म एका चौकटीत ठाकूनठोकून बसवला जातो. हा उद्योग तथाकथित धर्ममार्तड, धर्मनिष्ठ आणि धर्मगुरु करीत असतात. धर्माचा विजयध्वज फडकवण्याच्या आविर्भावात हीच मंडळी मूळ धर्माचा प्रचंड पराभव करीत असतात ! नावाच्या, लेबलाच्या, चौकटीच्या, चौकटीतल्या कर्मकांडाच्या दुराग्रहानं धर्मच मोडीत काढीत असतात !…
               मला तर हसूच येतं याचं की, – ज्या धर्मानं माणसांचं, मानव जातीचं रक्षण करायचं, तारण करायचं, धारण करायचं, – त्याच धर्माचं रक्षण – तारण करण्यासाठी बांग आणि आरोळ्या द्यायच्या! ‘इस्लाम खतरेमें है’ ही बांग काय, किंवा ‘ हिंदू धर्माच्या उद्धारासाठी उठा ! ‘ ही आरोळी काय, धर्माचं सामर्थ्य पटवीत नसून धर्माचं दुबळेपणच दाखवीत असते.
                  धर्म दुबळा कसा? ज्याला माणसांकडून रक्षणाची आवश्यकता लागते तो धर्मच कसा? जो अद्वितीय आहे तो धर्म धोक्यात येतो म्हणजे काय?…
मित्रा, ही सगळी भाषा आपमतलबी आहे. खरीखुरी धार्मिक नाही, हे तुझ्या लक्षात येऊ दे! असल्या घोषणांनी धर्माचं रक्षण होत नसतं. धर्म वर्धिष्णू होत नसतो. माणसं धार्मिक बनत नसतात. फक्त धर्माधतेच्या आहारी गेलेल्या, तथाकथित धर्माच्या आंधळया अनुयायांच्या भावनाफक्त भडकवता येतात ! भडकलेल्या भावनांनी कोणाचंच भलं होत नसतं!
म्हणून मित्रा, आज चाललेल्या धर्मगर्वाच्या गजबजटात देखील तू एवढंच लक्षात ठेव, ‘धर्म हा धर्मच असतो आणि धर्माचे नियम किंवा कायदे हे नैसर्गिकच असतात!’ परम ऋजु, शांत, प्रेमळ, सृजनशील असतात. संजीवक, समताप्रिय असतो. माणसामाणसात धर्म, वंश, वर्ण, जात, भाषा, स्पृश्य-अस्पृश्य, श्रीमंत, गरीब, हीन-दीन, स्त्री-पुरुष – असले भेद मानत नसतो.
                       सूर्याचा धर्म विश्वाला प्रकाश आणि ऊब देणं हाच आहे. पाण्याचा धर्म सतत वाहणं आणि प्राणीजातीची व पृथ्वीची तहाण भागवणं, समृद्धी आणणं हाच आहे! माणसाचा धर्मही मानवता हाच आहे ! म्हणून घोषणेच्याच भाषेत म्हणायचं असेल तर असंच म्हणू या, ‘गर्वसे कहो हम मानव है ! मानवता हमारा धर्म है !’
माणसानं मनुष्यपण विसरून किंवा घाऊक द्वेष पसरविणाऱ्या लेबलांच्या आहारी जाऊन कसं चालेल?
                          मित्रा, रात्र वैऱ्याची आहे ! सावध रहा !! सावध रहा !!

समता के सेनानी-शिक्षामहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील – प्रा. चंद्रकांत शंकर पाटगांवकर (1993)

                              कुछ पैसे खूनकी कमाई के होते है, कुछ पैसे आँसूओंकी कमाईके होते है, परन्तु ये पैसे थे पसीने की कमाईके। सुना के महात्मा फुले मार्केट में बोझा उठानेवाले कूली तथा हमाल लोगोंने अपनी एक दिन की कमाईसे ये पैसे दिये थे। दस, पाँच, दो तथा एक-एक रुपये की नोट और एक-एक सिक्का पसीनेके गंगाजल से पवित्र हुआ था। पुणे विश्वविद्यालयमें एक कॉलेज के डिपॉजिट के लिए कर्मवीर भाऊराव पाटील की रयत शिक्षण संस्थाको यु पैसे अर्पण किये गये।                               

                 सातारा जिल्हेके कराड गाँव मे देहाती गरीब किसान मजदुरोंके लडके-लडकियोंके लिए नया कॉलेज शुरू करने के लिए पुणे विश्वविद्यालयको नियमानुसार यह डिपॉजिट की रकम प्रदान की गयी। महाराष्ट्र के महान सामाजिक सुधारक एवं राष्ट्रीय संत श्री सद्गुरु गाडगे महाराज का नाम धारण करके ग्रामीण इलाके में यह महाविद्यालय जून १९५४ से शुरू हुआ। आज तक देश के इतिहास में बडेबडे राजा-महाराजा अथवा बडेबडे धनिक-पूंजीपती दान देते रहे और उनके नाम स्कूलो तथा कॉलेजोंको दिये गये।

              मगर यहाँ गरीब किसान मजदूरोंके पसीनेकी कमाईसे शुरू किये गये एक ग्रामीण महाविद्यालयको नाम दिया गया राष्ट्रसंत श्री गाडगे महाराज का, ग्रामीण जनता के लिए शिक्षा प्रसार करनेवाले कर्मवीर भाऊराव पाटील के निःस्वार्थ कार्य के कारण यह संभव हुआ। कर्मवीर भाऊराव पाटील का पूरा नाम था भाऊ पायगोंड पाटील। महाराष्ट्र के कोल्हापुर जिले में कुंभोज नामके गाँवमे २२ सितंबर १८८७ के दिन उनका जन्म हुआ। प्राथमिक शिक्षा के बाद माध्यमिक शिक्षा के लिए वे कोल्हापुर शहर में राजाराम हाईस्कूल में पढने लगे, कोल्हापुर रियासतके महाराजा शाहू छत्रपती समाज सुधारक थे। विविध जातिधर्मों के विद्यार्थियोंमें शिक्षा प्रसारको प्रोत्साहन देनेके लिए उन्होने कोल्हापुर शहर में वसतिगृहोंकी स्थापना के लिए सहायता प्रदान की। मराठा, नापित, दलित, मुस्लिम, जैन, लिंगायत, सारस्वत आदिजातिधर्मों के छात्र वसतिगृहोंमें बडी संख्यामें उत्साहसे पढाई करने लगे। जैन बोडिगमें भाऊराव पाटील ने प्रवेश पा लिया।
                         मगर एक दिन भाऊराव को इस बोडिंगसे निकाल दिया गया। उस दिन कोल्हापुर में ऐसे ही एक दलितोंके छात्रोंके लिए वसतिगृहका उद्घाटन हुआ था। ‘मिस्. क्लार्क होस्टेल’ ऐसा उसका नामकरण का समारोह था, उस समारोहमें भाऊराव पाटील उपस्थित थे। शामको बोडिंगमें वापस आनेपर वे सीधे भोजनकक्षमें गये तो उनको स्नान करनेके बादही भोजन मिलेगा, ऐसा बताया गया। उन्होने कहा, ”मैंने सुबह स्नान किया है। दलितोंके वसतिगृहके उद्घाटन समारोहमें शामिल होनेसे कोई अमंगल बात मैंने की नही।” और उन्होने स्नान करनेसे इनकार कर दिया, सुपरिंटेंडेंट महोदयने भोजनकक्ष को ताला लगा दिया। भाऊराव बचपनसेही विद्रोही स्वभावके थे। 

                    उन्होने काँच फोडकर खिडकी खोल दी और यथेच्छ भोजन किया। अनुशासन भंग के दंड स्वरूप उनको बोडिंगसे निकाल दिया गया अब आगे कहाँ जायेंगे? भाऊराव के एक वर्गबंधु बिालासाहब खानविरकर छत्रपती शाहू महाराजके रिश्तेदार थे। वे राजवाडेपरही रहकर पढाई कर रहे थे। उनकी मददसे भाऊरावभी राजवाडेपर रहकर पढाई करने लगे।

                       यहाँ छत्रपती शाहू महाराजके निकट संपर्क का लाभ भाऊराव को मिला, भाऊराव बचपनसेही बलोपासना करते थे. उनकी देहयष्टी बलदंड थी। शाहू महाराज कुश्तीके शौकीन थे। स्वयं कुश्तीकेअखाडे में वेभी मल्लविद्याकी आराधना करते थे। भाऊ राव कभी कभी शाहू महाराजकी देहको मालिश करते थे तो शाहू महाराज भाऊरावके मन को मालिश करते थे। माहाराजके पुरोगामी समाज सुधारके विचारोंसे भाऊराव प्रभावित हुए। भाऊरावकी दृष्टि विशाल बनी उपेक्षित तथा दलित समाज के प्रति उनके मन में करुणाजागृत हुई। उनके अधिकारोंके लिए और उनकी प्रगतिके लिए कार्य करनेकी प्रेरणा और स्फूर्ती भाऊरावको मिली।
                     सन १९०७ का यह किस्सा है। भाऊरावके पिताजी इस्लामपुरमें नौकरी के लिए रहते थे। माता-पितासे मिलनेके लिए वे इस्लामपुर गये, वहाँ पाठशालामें एक छात्र क्लासरूम के बाहर बैठकर पढ़ रहा था, पूछताछ करने पर शिक्षक महोदयने बताया कि वह छात्र दलित जातिका है इसलिए वह वर्ग में बैठकर पढाई नहीं कर सकता। भाऊराव उस छात्रसे मिले। उसका नाम था ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप, संत ज्ञानेश्वर के महाराष्ट्रमें यह ज्ञानदेव ‘ज्ञान’ से वंचित था।
                         भाऊराव उसे साथ लेकर अपने घर गये! रसोई घरमें अपने साथ बिठाकर उसे रवाना खिलाया! बादमें जब माताजीको मालुम हुआ कि वह छात्र अछूतजातिका था तो माताजीके हाथों मारपीट का प्रसाद भी भाऊराव को मिला ! फिर दुसरी बार जब उसको लेकर भाऊराव घर आये तो माताजीने दोनों को भी रसोई घरके बाहर बिठाकरही रवाना परोसा! कुछ वर्षों के बाद सातारामें सब जातिधर्मों के लिए भाऊरावने जो वसतिगृह चलाया उसमें सभी हरिजनोके छात्रोंके साथ वही माताजी रहने लगी और उनके साथ रवाना भी रवाने लगी!
                              ज्ञानदेव घोलप को साथ लेकर भाऊराव कोल्हापूर आये ! दलितोके लिए खोले गये मिस क्लार्क हॉस्टेलमें उसको प्रवेश देने में मदद की। भाऊराव पाटील के शैक्षणिक कार्यका पहला विद्यार्थी ज्ञानदेव घोलप था, वही ज्ञानदेव आगे चलकर बम्बई विधिमण्डलका प्रथम हरिजन सदस्य बना।
                            भाऊ रावकी पढाई मॅट्रिकतकही हुई। आगे वे प्रगति नहीं कर सके। १९३२ में भाऊरावका विवाह लक्ष्मीदेवी के साथ हुआ. शिक्षा अधूरी रह गई थी। नौकरी करना उनको मंजूर नही था। “यदि किसीकी सेवाही करनी है तो लाखों अछूत दलितोंकी सेवा करूँगा। उनको शिक्षा प्रसारका महत्त्व समझाकर उनकी उन्नतिके लिए आजीवन कार्य करूंगा।” ऐसी उनकी मनोधारणा थी। एक दिन कोई अतिथी, पिताजी पायगोंडा और भाऊराव एक साथ पंक्तिमें बैठकर खाना खा रहे थे। पत्नी लक्ष्मीबाई खाना परोस रही थी। अतिथी महोदयने सहज पूछताछ की, आपक यह सुपुत्र क्या करते हैं?” पिताजीने उत्तर दिया, “दो समय भोजन करते है, और दिनभर भटकते रहते है।”
                      लक्ष्मीबाईकी आँखोंमें आँसू डबडबाये, पिताजीको तीखी बातें भाऊरावके मनपर आघात कर गयीं, उनके स्वाभिमानपर चोट पहुँची। उसी दिन घर छोडकर वे सातारा गये, वहां छात्रोंकी ट्यूशन्स वे करने लगे। स्वयं उनकी पढाई अधूरी और कच्ची रह गयी थी। लेकिन अब वे पूरी लगनसे अध्ययन करकेही विषयकी तैयारी करके छात्रोंको पढाने लगे। थोडेही दिनोंमे सातारा शहरमें उत्तम शिक्षक का गौरवपूर्ण स्थान उन्हे प्राप्त हुआ। ‘पाटील मास्तर’ के नामसे सातारा शहर उनको पहचानने लगा।
                     धीरे धीरे महाराष्ट्र के अन्य गाँवोंमें भी शिक्षा प्रसार करनेके प्रयत्न भाऊरावने शुरू किये। १९०९ में दुधगाव में ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम’ शुरू हुआ। फिर १९१९ में कराड के पास काले नामके देहातमें ‘रयत शिक्षण संस्था’ की स्थापना की। वसतिगृह, प्राथमिक पाठशाला तथा रात्रशाला शुरू की। महात्मा ज्योतिबा फुलेद्वारा स्थापना किये गये ‘सत्यशोधक समाज’ के वे प्रचारक बने। बहुजन समाज और दलित समाजके उद्धारके लिए शिक्षा प्रसारसे ही बुनियादी प्रारंभ करना चाहिए ऐसा अनुभवसे उन्होने निर्णय किया इसी शिक्षा प्रसार के लिए ‘रयत शिक्षण संस्था’ की स्थापना उन्होने की।

                   कुछ समय तक किर्लोस्कर कंपनीके लोहेके हल किसानों में लोकप्रिय बनाने के लिए वे प्रचारक बने। वह काम छोडकर सातारा में एक पारसी’कूपर इंजिनियरिंग वर्क्स’ की स्थापना १९२२ में की। परंतु यहाँ भी मतभेद हुए। कारखाने में जो मुनाफा होगा उसका दस प्रतिशत हिस्सा गरीबों के शिक्षा प्रसारके लिए खर्च करनेकी शर्त भाऊरावने रखी थी। शुरूमें कूपरने उसको स्वीकार भी किया था। लेकिन बाद में वह इनकार करने लगा। भाऊरावने उससे संबंध तोडकर पूर्ण रूपसे शिक्षाप्रसार के कार्यपरही अपनी शक्ति केंद्रित कर दी।
                                   धनिकोंसे ऐसी मदद मिलने की उम्मीद उन्होने छोड दी। बहुजन समाजके गरीब छात्रोंको अपने खुदके बलपरही स्वावलंबनसेही शिक्षा प्राप्त करनी चाहिए, ऐसा उन्होने उपदेश दिया। “स्वावलंबी शिक्षा यही हमारा मूलमंत्र है।” यह रयत शिक्षण संस्थाका ब्रीदवाक्य मित्र कूपरके साथ पुछताछ करनेपर उन्होंने निश्चित किया। ऐसे हजारों-लाखों छात्रोंने पढाई करते करते स्वयं कष्ट और मेहनत करकेही अपनी शिक्षा प्राप्त की है। महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज और महात्मा गांधी भाऊराब पाटीलके आदर्श महापुरुष थे। महात्मा गांधीजीके हाथोंसेही सातारामें ‘श्री छत्रपती बोडिंग हाऊस’ का नामकरण उन्होंने करवाया,उसका किस्सा बडा मार्मिक हैं।
                  २५ फरवरी १९२७ पुराने बंगलोर-पूना महामार्गसे महात्मा गांधी सातारा शहरमें प्रवेश करनेवाले थे। छात्रोंने गांधीजीकी गाडी रोक दी। उनको पता चला कि, कर्मवीर भाऊराव पाटील अपने छात्रोंको लेकर वहाँ उनसे मिलनेके लिए आये हैं। कर्मवीर पाटील के छात्रोंके वसतिगृह के लिए महात्माजीकी भेंट का कार्यक्रम पूर्व निर्धारित था। फिर भी कुछ असंतुष्ट और विघ्नसंतोषी लोगोंने भाऊराव के बारेमें गलत फहमियाँ फैलाकर यह भेंट का पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द करवाया था।

                   गांधीजीसे प्रार्थना करने के लिए वे छात्र आये थे। गांधीजीको सत्यस्थिती मालूम मLहो गयी. विविध जाती धर्मों के छात्र एक साथ रहकर और स्वयं मेहनत करके वसतिगृहमें अध्ययन करते हैं यह जानकर गांधीजी बहुत प्रभावीत हुए, ऐसे वसतिगृहके कार्यक्रम के रद्द होनेपर उन्होंने आश्चर्य प्रकट किया। उन्होंने इस वसतिगृहको भेंट देना स्वीकार किया। भाऊराव और उनके छात्र आनंदित और उत्साहित होकर वसतिगृहमें वापस गये।
                       २५ फरवरी १९२७ के दिन महात्माजीने भाऊराव पाटील के छात्रोंके वसतीगृहको भेंट दी. भाऊराव का १९०७ का पहला दलित छात्र ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलपने स्वागतपर भाषण किया। गांधीजीने स्वयं अपनी आँखोंसे देखा कि अपने अपने जातिके और धर्मके भेदोंको भूलकर सब विद्यार्थी एक साथ रहते हैं। एक साथ मेहनत करते हैं। एक साथ खाते-पिते हैं और एक साथ पढाई करते हैं। उस समय वसतिगृहमें कुल ३४ छात्र थे। उनमें १३ मराठा, १३ हरिजन, १ मुसलमान, १ धोबी, १ नाई, १ वडार, १ जैन, १ लिंगायत, १ ब्राह्मण और एक रामोशी ऐसे विविध जातिधर्मोके छात्र थे। सभी बंधुभावसे रहते थे। स्वयं भाऊराव पाटील जैन थे और सभी शाकाहारी थे।
                           गांधीजीको खूब आनंद हुआ। उनके शुभहाथों श्री. छत्रपतीशाहूबोडिग हाऊस ऐसा नामफलकका अनावरण समारोह संपन्न हुआ। अपना संतोष प्रकट करते हुए गांधीजीने भाऊरावको धन्यवाद देते हुए कहा, भाऊराव, साबरमतीके आश्रम में जो मैं कर न सका, उसे आपने यहाँ सफलतापूर्वक साध्य किया है ! राष्ट्रीय एकात्मताके इस कार्यके लिए मेरे शुभ आशीर्वाद हैं !’ समारोहकी समाप्तीपर जाते जाते गांधीजीने पूछा ‘भाऊराव इस वसतिगृहको आपने छत्रपती शाहू महा राजका नाम प्रदान किया है, उन्होनें कितने पैसे दिये हैं ?’
 
                   ‘एक पैसा भी नहीं ! ‘ भाऊरावने तुरंत जबाव दिया ! आगे उन्होने कहा, सभी जाति धर्मोके छात्रों के लिए शिक्षा प्रसारके और समाज सेवा करनेके उदात्त विचार शाहू महाराजने मुझको दिये हैं. उनसे मुझे इस कार्यकी प्रेरणा तथा स्फूर्ती मिली है।’
              १९३२ में अछूतोंके लिए विभक्त जातीय मतदारसंघके निर्माण की घोषणा अंग्रेज राज्यकर्ताओने की ! महात्मा गांधीजीने उसके विरोधमें आमरण अनशन येरवडा जेलमें शुरू किया। भाऊरावके मनमें महात्मा गांधी और डॉ. आंबेडकर दोनोके प्रति अत्यंत आदर का भाव था। आखिर गांधी-आंबेडकर समझौता हुआ गांधीजीके प्राण बच गये। विभक्त मतदार संघ का आग्रह डॉ. आंबेकरजीने छोड दिया, केवल दलितोंके लिए आरक्षणपर उन्होंने समझौता किया! गांधीआंबेडकर समझौतेकी स्मृतीमें १९३२ में ‘ युनियन बोडिंग हाऊस’ की स्थापना भाऊराव पाटीलजीनेपूनामें की।
                        मराठवाडा विश्वविद्यालयके भूतपूर्व कुलगुरु कोर मराठीके सुप्रसिद्ध दलित साहित्यिक ॲडव्होकेट श्री. शंकरराव खरात इसी बोर्डिंग के छात्र थे। आज महाराष्ट्रके तथा भारतभर के अनेकों महाविद्यालयोंके प्राचार्य, प्रोफेसर विश्वविद्यालय के कुलगुरु राजनैतिक नेता, समाज सुधारक आदि कर्मवीर भाऊराव पाटीलको रयत शिक्षण संस्थामें शिक्षा पाकरही अपने अपने क्षेत्र में कार्यरत हैं। भारतकें राष्ट्रपति द्वारा “पद्मभूषण’ की उपाधी और पुणे विद्यापीठके द्वारा डी. लिट, की उपाधी उन्हे प्रदान की गयी, ९ मई १९५९ के दिन उनकी जीवन यात्रा समाप्त हुई !

तिमिरातून तेजाकडे – नानासाहेब गोरे (1993 राष्ट्र सेवा दलपत्रिकेतून)

           ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ ही प्रार्थना माणसाने आजही करावी. पण ती स्वतःच्या बुद्धीला उद्देशून करावी.आकाशात उद्धारकर्ता बसलेला आहे अशी समजूत करून घेऊन त्याला आवाहन करण्यासाठी ही प्रार्थना नाही. देवावाचून मानवी समाजाची नव्हे तर सृष्टीचीही धारणा करणे आता शक्य कोटीतील संकल्प झाला आहे, असे माझे निश्चित मत बनले आहे.

        विश्वाचे मूलद्रव्य निर्दोष, निखळ होते, पण कशाची तरी भेसळ झाल्याने गढूळ आणि दोषयुक्त ठरले, हा सिद्धान्त मला मान्य होत नाही. माझ्या मते मूळ द्रव्यच सत्त्व, रज, तम यांनी युक्त होते. ते संमिश्र द्रव्य उत्क्रांत होत होत बुद्धी असलेला मानव निर्माण झाला आणि मानवाने बुद्धीच्या साहाय्याने मूळ द्रव्यातील जे व्यक्तीला आणि समष्टीला अहितकारक असणारे धातू ते हळूहळू दूर करीत स्वतःचा विकास साधलेला आहे. म्हणूनच समर्थ रामदासांनी ‘मानत मानत घालावे मूळाकडे ‘ हा जो उपदेश केला आहे, त्यामध्ये मूळ स्त्रोत शुद्ध होता ही जी अंतर्भूत कल्पना आहे तिचा त्याग करावा लागतो. मानवाला मुळाकडे अथवा आदिमाकडे जावयाचे नसून त्याला दोषमुक्त अशा अंतिमाकडे वाटचाल करावयाची आहे.

             गढूळ अशा आदिम मूलद्रव्याचे निर्मळ अशा अंतिम द्रव्यात रूपांतर करणे, ही मानवी बुद्धीची जबाबदारी आहे, असे मी मानतो. ज्ञानेशांचे पसायदान उपलब्ध धनाचा म्हणजेच साधनांचा जर सम्यक् उपयोग केला तर केवळ शुभचिंतन राहण्याचे कारण नाही. अशी साधनसंपत्ती विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत कोणत्याच काळी मानवाच्या हाताशी नव्हती. सर्वेऽपि सुखिनः ‘ करण्याचे आव्हान मानवाच्या बुद्धीने ‘स्वीकारले पाहिजे. ते आव्हान ईश्वर पेलू शकत नाही ही सिद्ध गोष्ट आहे.
                   माझ्या चिंतनयात्रेत मी या घटकेला ज्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहे, ते ठिकाण दाखवण्याचा प्रयत्न मी येथवर केला आहे. माझ्या चिंतनातील सर्वच आध्यात्मिक व ऐहिक विषय मी येथे मांडू शकलो नाही, कारण तसे केले असते तर लेखाचा विस्तार फार झाला असता. माझ्या विचारांची दिशा सूचित करण्यासाठी येथे जे लिहिले आहे तेवढे पुरेल, असे मला वाटते. आतापर्यंत मी कोणालाही गुरू केलेले नाही.

          गांधी किंवा मार्क्सलाही नाही, हे यावरून स्पष्ट होईल, कारण या सतत बदलत्या विश्वाचे आणि मानवसमाजाचे अक्षरचित्र कोणापाशी कितीही दिव्यचक्षू असले तरी तो रेखांकित करू शकेल असे मला वाटत नाही. कॅमेरा जशी क्षणचित्रे टिपतो तशीच आतापर्यंतच्या ऋषिमुनींनी, विचारवंतानी आणि विद्वानांनी क्षणचित्रे टिपली आहेत. ती समाजचित्रे त्या काळाच्या, तत्क्षणीच्या परिस्थितीची चित्रे आहेत. म्हणून वेदकालीन चिंतन, कुरुक्षेत्रावरील चिंतन, बोधिवृक्षाखालील चिंतन, गॅलिलीओच्या आसमंतातील आणि हीरा डोंगरावरील चिंतन आजच्या चिंतनाला बंधनकारक ठरता कामा नये.               

              याचा अर्थ ते सर्वस्वी त्याज्य ठरते असाही नाही. नीरक्षीर न्यायानेच त्याचा स्वीकार व्हावयास हवा. माझ्या मते ईश्वर, अल्ला, तेरे नाम’ असे म्हणून सर्वधर्मसमभाव निर्माण होणार नाही. कारण जगाचे वेगवेगळे दर्शन त्या त्या धर्माच्या प्रेषितांना झाले, म्हणून तर हे धर्म त्यांनी प्रस्थापित केले. प्रत्येक धर्म पाचरणापासून दूर राहा असे सांगतो हे खरे, परंतु पाप कशास म्हणावे याबद्दल भिन्न धर्माची भिन्न मते पडतात आणि त्यात पुन्हा स्वमताबद्दल पराकोटीचा आग्रह आणि अन्य मताची निंदा; तसेच प्रत्येक धर्मतत्त्वाशी अविच्छिन्नपणे बांधली गेलेली कर्मकांडे, ही धर्माची वैशिष्टये मानली जातात. आताच्या युगातल्या समाजाच्या गरजा किंवा धारणा कोणताही विद्यमान धर्म पुरा करू शकत नाही, या अर्थी सर्व धर्म समान आहेत, असे मानण्यास माझी तयारी आहे. म्हणून परंपरागत सर्व धर्म आणि दर्शने बाजूला सारून व्यक्तिमात्राला धर्मबंधनातून मुक्त करून, आपापल्या मती.

        प्रमाणे कोणत्याही धर्मविचाराचा अथवा दर्शनाचा स्वीकार अथवा त्याग करण्याची मोकळीक जर व्यक्तिमात्राला राहिली, तर ती सर्वांत उत्तम गोष्ट होईल, माझ्या उर्वरित आयुष्यात माझी ही मते पालटण्याचासंभव कमी आहे, जवळजवळ नाहीच. परंतु जर मला काही नवीन प्रकाश माझ्या बुद्धीने दाखवला, तर तो अव्हेरण्याचीही माझी इच्छा नाही.
                          माझ्या जीवनात मी भावनांपेक्षा विचारांना आणि विचाराहून कृतीला अधिक महत्त्व देत आलो आहे. म्हणून रामदासाहून शिवाजी थोर, रानड्यांपेक्षा फुले योर, बीड रसेलपेक्षा श्वाईट्झर थोर. जे. कृष्णमूर्तीपेक्षा मदर तेरेसा थोर आणि अस्पृश्यतानिवारणासाठीस्पृश्यांची मने वळवू पाहणाऱ्या गांधीजींपेक्षा अस्पृश्यांनाच बंडासाठी उभे करणारे आंबेडकर मला थोर वाटतात. सर्व समाजाच्या भल्यासाठी विचार, उच्चार आणि आचार यांची जेथे मिठी पडलेली दिसेल तेथे मी नतमस्तक होतो. ‘तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा तो एकच मार्ग आहे, अशी माझी धारणा बनली आहे.

हरिजन मंदिर प्रवेश उपोषण साने गुरुजी आणि विनोबा-रामभाऊ म्हसकर (राष्ट्र सेवा दलपत्रिका- जून १९९९)

                    महाराष्ट्राचे एक दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा. ह्या विठोबाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा म्हणून साने गुरुजींनी १ मे ते १० मे ४६ ला पंढरपुरी प्राणांतिक उपोषण केले होते. तत्पूर्वी सहा महिने अगोदर, हरिजनांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा या मागील आपली भूमिका समजावून सांगण्यासाठी गुरुजींनी महाराष्ट्रभर प्रचार दौरा केला होता. या प्रचारात गुरुजींना साथ होती पितृतुल्य सेनापती बापट यांची.
                    त्यांची प्रचारासाठी एक जुनी गाडी होती. ही गाडी घेऊन ही मंडळी वास आली. साने गुरुजींच्यासाठी विनोबा मार्गदर्शक आणि गुरू असल्याने विनोबांच्या भेटीस पवनारला धाम नदीच्या काठावरील जमनालालजींच्या लाल बंगल्यावरही मंडळी आली.
त्या वेळी विनोबांचा आश्रम ‘लालबंगला’ या नावाने ओळखला जात असे. तेव्हा आश्रमातचारपाचजणचरहात असत.
                   ही मंडळी विनोबांच्याकडे पोहोचली. नमस्कार चमत्कार झाला. गुरुजींना विनोबांच्याबद्दल अति आदर असल्याने ते विषय काढतील, बोलतील ही शक्यता नव्हती. विनोबांनी हसत हसत सेनापतींना झालेल्या प्रवासाचा वृत्तांत विचारून, एकूण काय लक्षणे दिसतात हे जाणून घेण्याची इच्छा दर्शविली, तेव्हा सेनापती गुरुजींच्याकडे बोट दाखवून हसत हसत म्हणाले, “विनोबा, काही काळजी करण्याची गरज नाही. याला कुणी मरू देणार नाही. हं, थोडी कसोटी होईल, व्हावीही. चिंता करण्याचं कारण नाही”
                विनोबांनी गुरुजींतडे पाहिले. गुरुजी त्यांच्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे एका पायाची घडी घालून दूसरा पाय उभा ठेवून त्यावर हात ठेवून बसले होते. त्यांची मान खाली होती. बाहेर मोठमोठ्या गर्जना करणारे गुरुजी तिथं मात्र संकोचून बसून होते.
काही वेळ ही मंडळी बसली. गोष्टी झाल्यानंतर प्रचारासाठी बाहेर पडली. निघण्यापूर्वी गुरुजींनी विनोबांना प्रणाम केला. विनोबांनी गुरुजींना न्याहाळले, विनोबांच्या डोळ्यांतून ओसंडणाऱ्या वात्सल्याचे स्नान गुरुजींनी केले आणि ते बाहेर पडले.
धाम नदी ओलांडून गावातल्या कार्यक्रमासाठी सर्वजण निघाले. धाम नदीचा पूल पार करून ही मंडळी पुढे सरकत होती तेव्हा एक ग्रामवासी समोरून आला. त्याने रस्त्यावर असलेल्यागुरुजींना, स्वतःच्या पायातील चपला बाजूला काढून त्यांच्या पायावर डोके ठेवून प्रणाम केला. गुरुजींनी नदीच्या पलीकडून एकदा आश्रमाकडे पाहिले आणि ते स्थान हृदयात साठवीत पुढील प्रवासाला प्रारंभ केला.
              गुरुजींनी मंदिर प्रवेशासाठी उपवास सुरू केल्यानंतर रोज त्यांच्या प्रकृतीबद्दल काही ना काही वृत्त येत असे. विनोबाजी लाल बंगल्यासमोरील मैदानात तेव्हा चिंतन करीत फिरत असत. गुरुजींच्या उपवासानंतर विनोबांच्या चिंतनात थोडी चिंता पण कालवली गेली होती.
एक दिवस पत्र आले. त्यात होते की गुरुजींची प्रकृती तशी चांगली आहे परंतु हृदयावर परिणाम होत असल्याचेजाणवते. तेव्हा मी तिथे होतो. विनोबा म्हणाले, “हृदयावर परिणाम व्हायला लागल्यावर बाकीच्या इंद्रियांवर परिणाम व्हायला वेळ काय लागतो.

            काळजी करण्यासारखी स्थिती दिसते.’आणि त्यानंतर ते पुन्हा बंगल्यासमोरच्या ओसरीवर फिरु लागले. विनोबांच्या अंतरंगात काय चालले होते याची आपण काय कल्पना करणार? परंतु निर्मल हृदयातील काळजी स्पर्श केल्याशिवाय कशी राहील? गुरुजींच्या ह्या हरिजन-प्रवेशाच्या संकल्पाला विनोबाजींचे उद्गारच बळ देणारे ठरले होते. एकदा बोलताना ‘मंदिरे हरिजनांना मोकळी नसावीत’ याचे दुःख विनोबांनी बोलून दाखवले होते आणि गुरुजींनी विनोबांची ही वेदना दूर करण्यासाठी आपल्या परीने हे पाऊल उचलेले होते. मंदिर हरिजनांसाठी मोकळे झाले आणि दिल्लीला आपल्या संध्याकाळच्या प्रार्थना सभेत म. गांधीजींनी या घटनेचा उल्लेख केला आणि साने गुरुजींचे अभिनंदनही केले.
गुरुजींची आणि विनोबांची पहिली भेट केव्हा झाली, कशी झाली याची मला माहिती नाही. परंतु गुरुजींच्या साहित्यात विनोबांच्या बद्दल प्रकट केलेली आदराची भावना पाहिली की एक आगळे दर्शन होते.
                  साने गुरुजींसारखे सिध्दहस्त लेखक विनोबांना लाभले आणि गीता प्रवचने अवतरली ! पूर्वीही अनेकदा विनोबांनी गीतेवर प्रवचने दिली होती, परंतु ती हवेतच विरली होती. धुळ्याच्या कारागृहातील ही प्रवचने केवळ गुरुजींच्या कृपेने आपल्याला लाभली, केवढे त्यांचे उपकार!
(सौजन्य : कथामाला मे ९९)

सेवा दल विचार विहार: छात्रभारती कशासाठी? -सुभाष वारे (1992)

                  डिसेंबर १९८३ मध्ये आपण छात्रभारतीची स्थापना केली. राष्ट्र सेवा दलास मातृ संघटना मानून आणि राष्ट्र सेवा दल पंचसूत्रीचाच स्वीकार करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यात छात्रभारतीने कामाला सुरुवात केली. पुढील वर्षी छात्रभारती दहा वर्षे पूर्ण करत आहे.
राष्ट्र सेवा दलातून संस्कारित अशा कार्यकत्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांत समतावादी विचारांच्या प्रसारासाठी काम करावे असे आपण मानतो. अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्री-पुरुष समानता, कामगार संघटना, छोटा शेतकरी शेतमजूर संघटना, रचनात्मक ग्रामीण विकास आणि अशा कितीतरी क्षेत्रांत राष्ट्र सेवा दल कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहिलेले दिसतात. छात्रभारती अशाच बंधु संघटनांसारखी ग्रामीण-कष्टकरी-कॉलेज युवकांमध्ये काम करणारी संघटना, परंतु या सर्व बंधु संघटनांपेक्षा एक वेगळी जादा जवाबदारी अंगावर असणारी संघटना. राष्ट्र सेवा दलाला ज्याप्रमाणे आपण कार्यकत्यांची शाळा मानतो ती भूमिकाही काही प्रमाणात छात्रभारती पार पाडत आहे.

               सर्वसाधारणपणे सोळा ते पंचवीस वर्षे वयोगटातील युवक छात्रभारतीच्या संपर्कात येतो. अशा युवकांवरती साजाजिक जाणिवांचे संस्कार करून राष्ट्र सेवा दल परिवारासाठी कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम छात्रभारतीने पार पाडले पाहिजे-पार पाडत आहे. छात्रभारतीचे आजचे ९० टक्के प्रमुख कार्यकर्ते राष्ट्र सेवा दलाच्या शाखेतून आलेले नाहीत. किंबहुना आपल्या कॉलेजजीवनाची सुरवात करेपर्यंत समतावादी वा परिवर्तनवादी विचारांची तोंडओळखसुद्धा नसणारे हे कार्यकर्ते आज छात्रभारतीसाठी काम करत आहेत, राष्ट्र सेवा दल परिवारात सहभागी झाले आहेत.
मी असे मानतो की, या ठिकाणी छात्रभारतीला दुहेरी जबाबदारी पार पाडायची आहे. एका बाजूला अनेक दुष्प्रवृत्ती व उणिवांनी ग्रासलेल्या इथल्या शिक्षणव्यवस्थेत शांततामय संघर्षाच्या माध्यमातून योग्य ते बदल घडवून आणायचे आहेत.

                शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सहज प्राप्त कसे होईल हे पाहायचे आहे. म्हणजे ग्रामीण कष्टकरी विद्यार्थ्यांचे छोटेमोठे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेची ताकद वाढवायची आहे. आणि हे करत असतानाच दुसऱ्या बाजूला छात्रभारतीच्या झेंड्याखाली संघटित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सामाजिक बांधीलकीची जाणीव करून द्यायची आहे. विविध सामाजिक प्रश्नांची ओळख विद्यार्थ्यांनी करून घ्यावी, प्रश्नांच्या संभाव्य सोडवणुकीबद्दल काही विचार करावा आणि उद्या कॉलेज संपल्यानंतर जो जिथे स्थिरावेल तिथे कर्तव्यभावना मनात ठेवून स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याची आखणी करावी. परिवर्तनवादी संस्था, संघटना व आंदोलनात आपला शक्य तो सर्व सहभाग छात्रभारतीच्या छात्राने द्यावा या दृष्टीने त्याची मानसिकता घडवायची आहे.
                  जे ठरवलंय ते अशक्य नसले तरी खूपच अवघड आहे. कारण आपल्या सामाजिक जीवनात आज प्रचंड वादळे येत आहेत. धर्म, जात व प्रांत यांचे अभिनिवेष उफाळून आले आहेत. या ना त्या कारणाने माणसामाणसातली दरी संधीसाधू नेतृत्व वाढवत आहे. राजकीय पुढारी, जमीनदार, भांडवलदार, उद्योगपती, व्यापारी यांच्या गुंडगिरी व शोषणाविरुद्ध लढायचे कसे हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु त्याहून मोठा प्रश्न असा आहे की लढण्याचा नैतिक अधिकार कोणाला आहे ? मध्यमवर्गाचा वांझोटेपणा वाढतो आहे. शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, संघटित कामगार हा जो मध्यमवर्ग आहे त्याला चंगळवादी संस्कृतीची लागण झालेली आहे.

                         चंगळवादी संस्कृतीच्या बरोबरीने येणाऱ्या अनेक अपप्रवृत्तींनी हा वर्ग प्रदूषित झाला आहे. समाजाच्या पैशाने शिकून शहाणा झालेला हा वर्ग स्वत:च्या हिताच्या बाबीपलीकडे पाहायला तर तयार नाहीच, परंतु समाजव्यवस्थेने त्याला नेमून दिलेले कामही पूर्ण क्षमतेने व प्रामाणिकपणे करायला तयार नाही. शासकीय कर्मचा-यांबद्दल तर बोलायलाच नको. शासकीय व्यवहारात काटकसरीने नियोजन, कार्यक्षमता, वेगवेगळ्या विभागातील सहकार्य व सामंजस्य अजिबात नाही. आणि या सर्वामुळे राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान भ्रष्टाचाराने होणा-या नुकसानापेक्षा अधिक आहे.
                      या वातावरणात आपल्याला वाटचाल करायची तर असीम धैर्य आणि अपार त्यागाची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. वैयक्तिक आयुष्याच्या गणिताबरोबरच संघटनेची अवघड गणिते सोडवावी लागतील. अवघड परिस्थितीत काम करताना निर्माण होणारे ताणतणाव विसरून परस्पर विश्वास कायम ठेवावा लागेल याचे भान छात्रभारतीला आहे.
                        डोनेशन, संस्थाचालकांची दांडगाई, गुणांचे फेरफार, पेपरफुटीचे प्रकार, ‘फी वाढ, प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था, अपु-या शैक्षणिक सुविधा, जिद्द व आत्मविश्वास हरवलेला विद्यार्थी आणि व्यावहारिकतेशी नाते नसणारे पुस्तकी शिक्षण हे छात्रभारतीसमोरील आजचे प्रश्न आहेत, या प्रश्नांविरुद्ध छात्रभारती यथाशक्ती लढा उभारतच आहे. परंतु हे आजचे प्रश्न सोडवताना बेरोजगारी, महागाई, निसर्गाचा असमतोल, कर्जास्रोतांची भविष्यातील कमतरता हे या आपल्या कॉलेजजीवनानंतर भेडसावणाऱ्या प्रश्नांचेही भान छात्रभारतीच्या सैनिकांना आहे.
                     छात्रभारती असे मानते की, अंधश्रद्धा, जातीजातीतील तणाव, धार्मिक विद्वेष यांसारख्या प्रस्थापितांनी मुद्दामनिर्माण केलेल्या प्रश्नांच्या भोव-यात फिरत राहणे आपण थांबवायला हवे. या फसव्या प्रश्नांविरुद्ध लढताना अकारण होणारी दमछाक टाळायला हवी आणि ज्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची बांधीलकी आपण मानतो त्याच्या दररोजच्या जीवनमरणाच्या प्रश्नांवर अधिक नव्हे सर्व ताकद लावायला हवी. प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण, ग्रामीण आरोग्य, वनीकरण, पाण्याचे नियोजन, नैसर्गिक शेती, सहकारी उपक्रम, स्वयंरोजगार, शासकीय योजनांचा खया लाभार्थीपर्यंत प्रचार व प्रसार हे चळवळीचे अग्रक्रमाचे विषय बनले पाहिजेत. वरवर रचनात्मक वाटणाऱ्या या उपक्रमांतील संघर्ष आपण समाजावून घेतला पाहिजे.

                            याच उपक्रमांतून प्रस्थापितांच्या हितसंबंधांना खऱ्या अर्थाने धक्का पोहोचणार आहे. याच उपक्रमांमुळे आपले विरोधक नकली प्रश्नांच्या मैदानातूत वास्तव प्रश्नांच्या मैदानात ओढले जाणार आहेत आणि या मैदानातील आपला विजय सुनिश्चित आहे. आपल्या लक्ष्यगटापर्यंत पोहोचवून परिवर्तनवादी चळवळीचा शहरी मध्यमवर्गीयपणा संपवण्यास हातभार लावणारे हे विषय आहेत हे आपण समजावून घेतले पाहिजे. विशेषतः छात्रभारतीने ही भूमिका घेतली तरच छात्रभारती ग्रामीण युवक संघटनेशी टिकून राहील. स्वतःच्या विकासाचा मार्ग शोधतानाच संघटनाही वाढवील. जय भारत !