मुक्तिदायी राजकारण व डॉ. आंबेडकरांचे धर्मचिंतन -डॉ. यशवंत सुमंत (March 1999)
१९९२ मध्ये धर्मांध शक्तींनी बाबरी मशीद उध्वस्त केल्यावर, धर्म, धर्मचिकित्सा याबद्दल फेरमांडणी सुरू झाली आहे. या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्मचिकित्सा आणि सामाजिक व राजकीय परिवर्तनाशी सुसंगत असा ‘धम्मा’ चा विचार यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे, मुक्तिदायी राजकारण व धर्मचिकित्सा यांची सांगड घालणारे हे टिपण.
आधुनिक भारतातील सर्वच प्रमुख राजकीय विचारवंतांनी भारतीय समाजातील जडणघणीतील धर्म आणि जातीसंस्था या दोन महत्वाच्या घटकांना हात घालूनच आपापल्या राजकीय विचारांची आणि व्यूहांची मांडणी केलेली आहे.डॉ आंबेडकर हेही यास अपवाद नाहीत. त्यामुळे बाबासाहेबांच्या राजकीय तत्त्वज्ञानाचे समग्र आकलन करुन घेताना त्यांचे धर्मविषयक चिंतन अभ्यासणे अगत्याचे ठरते. कारण त्यांचे धर्माविषयीचे विचार हा आधुनिक भारतातील आणि विशेषतः विसाव्या शतकातील भारतातील राजकीय चर्चा विश्वाचाच एक अविभाज्य भाग होता. हे चर्चाविश्व उपेक्षून डॉ.आंबेडकरांच्या धर्माषियक चिंतनाचे आकलन करुन घेणे नुसतेच अपुरे नव्हे तर विपर्यस्तही ठरण्याची शक्यता आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मचिंतन तीन टप्प्यांमध्ये समजावून घ्यावे लागते. सर्वसाधारणपणे असा एक समज दिसून येतो की आंबेडकरांचे धर्मचिंतन म्हणजे त्यांचे त्यांचे नवबौध्द-दर्शन हे होय आणि त्याचे बायबल म्हणजे बुध्द अँड हीज धम्म’ हे होय. बुध्द अँड हीज धम्म’ ही आंबेडकरांच्या धर्माविषयक चिंतनाचीच नव्हे तर एकूण आंबेडकरवादाचीच प्रधान संहिता आहे हे खरेच. त्यांची धर्माविषयीची ध्येयदृष्टी याच त्यांच्या अलौकीक ग्रंथात व्यक्त झाली आहे. या ध्येयदृष्टीच्या प्रकाशात आंबेडकर एकूणच धर्मसंस्थेबद्दल काय म्हणतात, भारतातील महत्त्वाच्या धर्मसंप्रदायाबद्दल काय म्हणतात, धर्माचे मानवी जीवनातील स्थान कोणते याही प्रश्नांची आपण जेव्हा चर्चा करु तेव्हाच आंबेडकरांचे धर्मचिंतन सम्यकपणे आपण पाहू.
धर्मचिकित्सा- आंबेडकर हे नुसतेच आंग्लविद्याविभूषितनव्हते तर राजनीतिशास्त्र, इतिहास, कायदा, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञान या सामाजिक शास्त्रांचे गाढे अभ्यासक होते. धर्म हे माणसातील अविवेकाचे द्योतक आहे अशी कोरडी बुध्दिप्रामाण्यवादी भूमिका आंबेडकरांनी कधीच घेतली नाही. सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासामुळे आंबेडकरांची धर्माविषयक दृष्टी अधिक कल्पक व प्रगल्भ बनली होती. एक महत्त्वाची सामाजिक संस्था म्हणून ते धर्म संस्थेचा विचार करीत होते. विविध मानवी समाजात धर्माचा उदय कसा झाला, त्या धर्माचे प्रकार किती याची आंबेडकरांनी इतिहासवादी भूमिकेतून चिकित्सा केली आहे.
धर्माचे मानवी जीवनातील महत्त्व त्यांनी पुरेपूर ओळखून घेतले होते आणि म्हणूनच धर्माविषयी उच्छेदवादी भूमिका ते घेत नाहीत. पण हे करत असतानाच धर्मसंस्थेचे स्वयंभू आणि स्वयंसिध्द पावित्र्यही त्यांनी कधी मान्य केले नाही. धर्म ही दैवी घटना नसून मनुष्य निर्मिती संस्था आहे आणि तिला जे पावित्र्य प्राप्त झाले केही माणसानेच बहाल केले आहे. या पावित्र्याचे स्त्रोत कोणते हे पाहणे म्हणजेच इतिहासवादी भूमिकेतून धर्म समजावून घेणे होय. आंबेडकरांनी जगभरच्या धर्मांचे जे परिशीलन केले ते याच मूमिकेतून. म्हणूनच धर्माचे तत्त्वज्ञान, धर्म संस्थांची निर्मिती, धर्माचे कर्मकांड, धर्मविधी, धर्माने केलेले शोषण किंवा शोषणास दिलेली मूक संमती वा सर्व बाबींची ते निर्भीडपणे चिकित्सा करतात.
धर्म व धर्मसंस्थेचा इतिहासवादी भूमिकेतून विचार करताना आंबेडकरांनी धर्म म्हणजे धर्मशास्त्र असा अर्थ घेतला आहे. धर्मशास्त्राचे दोन प्रकार संभवतात. एक नैसर्गिक धर्मशास्त्र आणि दोन साक्षात्कारी धर्मशास्त्र. डॉआंबेडकरांच्या मते ही दोन्ही धर्मशास्त्रे परस्परविरोधी नसून परस्परांना मदत करणारीच आहेत. नैसर्गिक धर्मशास्त्रानुसार ईश्वर व दैवी सत्ता हा सृष्टीचाच एक अविभाज्य घटक आहे. या भूमिकेतूनच नैसर्गिक धर्मशास्त्राने तीन सिध्दांत पुढे केले आहेत. (१) ईश्वर अस्तित्वात आहे आणि तो या सृष्टीचा व या विश्वाचा स्रष्टा आहे. (२) सृष्टीतील प्रत्येक घटनेवर त्याची सत्ता चालते आणि त्याच्या नैतिक सत्तेनुसार ईश्वर मानवी जीवनावर आपली सत्ता चालवतो. या दृष्टीने पाहता या दोन धर्मशास्त्रांत मूलगामी असा फरक नाही. ही दोन्ही धर्मशास्त्रे ईश्वराचे अस्तित्व, त्याची सृष्टीवरील नियामक सत्ता आणि मानवी समाजाचे नैतीक नियमन या तीन गोष्टी मानतात. त्यामुळेच “धर्म ही दैवी शासनाची आदर्श योजना सांगणारी व त्यानुसार समाजव्यवस्था घडवुन माणसाचे नैतिक जीवन नियमित करणारी ही संस्था आहे.” अशी आंबेडकरांनी धर्माची व्याख्या केली आहे.
अशा या धर्माची घटना घडते कशी? धर्माची ही घटना पहात असताना धर्मसंस्थेतील बदल लक्षात घेतले पाहिजेत असे डॉ.आंबेडकर यांचे म्हणणे आहे. धर्मसंस्थेत होणारे बदल दोन प्रकारचे असतात. (१) बाह्य बदल(२) अंतर्गत बदल धर्मसंस्थेशी संबंधित बाह्य बदल हे धर्मसत्तेची कक्षा व अधिकार क्षेत्र किती असावे याच्याशी संबंधित असतात. विज्ञानपूर्व काळात धर्मसत्तेने मानवी जीवन संपूर्ण व्यापले होते. पण विज्ञान क्रांतीने धर्माचे हे साम्राज्य उद्ध्वस्त केले. कोपर्निकसने धर्मसत्तेपासून खगोल शास्त्र मुक्त केले. डार्विनप्रणीतत उत्क्रांतिवादाने भूगर्भशास्त्र व जीवशास्त्राची सुटका झाली. आंबेडकर म्हणतात. “धर्माच्या बाबतीत विज्ञानाने क्रांती घडवून आणली त्यामुळे विचार स्वातंत्र्याची प्रस्थापना झाली. समाज आत्मनिर्भर झाला. माणसे निर्भय झाली.” आंबेडकरांच्या मते वाढत्या ऐहिकीकरणामुळे माणसाची सृष्टी व समाजावरील सत्ता निर्णायक होत गेली व शास्त्रज्ञच नव्हते तर धर्मशील व्यक्तींनाही हे पटले की धर्माने सांगितलेल्या कित्येक गोष्टी निरर्थक होत्या. टाकाऊ होत्या आणि खऱ्या धर्म जीवनासही मारक होत्या.
धर्माचा सामाजिक प्रभाव- मात्र धर्मसंबंधीच्या या बाह्य क्रांतीने मानवी जीवनातून धर्माचे समूळ निर्मूलन झाले असेनाही. विज्ञानाच्या क्रांतीमुळे धर्माचे सर्वव्यापी क्षेत्र आक्रसले, संकुचित झाले इतकेच ! एक सामाजिक शक्ती म्हणून धर्म हा अद्यापही समाज जीवनात प्रभावीपणे वावरताना दिसतो. धर्माची ही सत्ता, प्रभाव समजून घेण्यासाठी आंबेडकर धर्मातील अंतर्गत बदल’ काय झाले याची मीमांसा करतात. रानटी, आदमी टोळ्याच्या धर्मापासून सुसंस्कृत समाजातील धर्मापर्यंत धर्माचे झालेले संक्रमण हा दुसरा टप्पा होय.
आंबेडकरांच्या मते आदिम समाजाचा धर्म हा मुख्यत्वे माणसाच्या ऐहीक जीवनाशी आणि ते जीवन टिकवण्याशी संबंधित होता. म्हणूनच आदिम धर्मातील जवळपास सर्वच विधी हे मानवी जीवनातील संघर्षमय टप्प्यांशी निगडीत असलेले दिसतात या सर्व टप्प्यांवर माणसाला शारीरिक वा मानसिक पातळीवर एक प्रकारचा जीवघेणा संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष सुकर व्हावा तसेच माणसाचे जीवन सुरक्षित रहावे म्हणून आदिम समाजातील मारसाने जादुटोणे, मंत्र, तंत्र, गंडे-दोरे, बळीची प्रथा या सारखे यातुविधी शोधून काढले. आंबेडकर म्हणतात की धर्माचा उदय हा यातुविधीत नसून तो माणसाच्या जीवनधारणेत व समाजधारणेच्या स्वभावसिध्द संकल्पात आहे.
जसजसे जीवन हे अधिक सुरक्षित होत जाईल तसतसे यातुविधी व त्याला चिकटलेली धर्मकल्पना नष्ट होत जाईल. आदिम सामाजाच्या धर्माची प्रमुख अशी दोन वैशिष्ट्ये आंबेडकरांनी नमूद केली आहेत. आदिम सामाजाच्या धर्मात ईश्वर संकल्पना नव्हती. आणि धर्म हा नैतिकतेशी संबंधित नव्हता आदिम समाजाजीही नीती होती पण ती धर्मापासून स्वतंत्र अशी होती. जीवन धारणेसाठी धर्माने जन्म, विवाह, मृत्यू या संबंधीचे संस्कारविधी करावेत आणि समाजधारणेसाठी समाजाने नीती नियम घालून द्यावेत अशी ही विभागणी होती. अर्थात या दोन्हीचे प्रयोजन एकच होते. आणि ते म्हणजे मानवी जीवनाची सुरक्षितता व सातत्य टिकवणे हे होय.
मग ईश्वरनिष्ठ धर्म आणि नैतिकतेचा अन्योन्य संबंध कधी प्रस्थापीत झाला? आंबेडकर म्हणतात, आदिम समाजात वीरपूजेची किंवा विभूतीपूजेची जी प्रथा होती त्यातून ईश्वराची संकल्पना विकसित झाली व ईश्वरवादीधर्म उदयास आला. तसेच जीवनाचा स्रष्टा कोण या विषयी जेव्हा तत्वचिंतन सुरु झाले तेव्हा त्यातून निर्मिकवाद निर्माण झाला. धर्मामध्ये झालेले हे दुसरे परिवर्तन होते. आणि याच टप्प्यावर धर्म हा ईश्वराशी व ईश्वराच्या नीतीशी निगडित झाला. आंबेडकर म्हणतात “सुसंस्कृत समाजात ईश्वर हा धर्माचा केंद्राबिंदू झाला आणि धर्माने नीतीची जागा घेतली.” याचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा समाजात नैतिक, मूल्यात्मक संघर्ष निर्माण झाले तेव्हा तेव्हा माणसाला धर्माशीच दोन हात करावे लागले आहेत आणि भविष्यातही ते करावे लागतील धर्माचे स्वागत वा निषेध हा येथून पुढे नैतिकतेच्या संदर्भातच होत रहाणार ही आंबेडकरांची भूमिका आहे.
प्राचीन समाजाकडून आधुनिक समाजाकडे जे मानवी जीवनाचे संक्रमण झाले त्यातूनही माणसाच्या धर्मविषयक धारणात आमूलाग्र बदल झाला. हे धर्मांतर्गत असे दुसरे महत्त्वाचे परिवर्तन होते. देवं आणि त्याचे अनुयायी यांच्यातील संबंध हे रक्तसंबंधावर आधारीत होते. देवाचे पितृत्व हे जैविक, प्रत्यक्ष असे होते. आणि म्हणूनच प्राचीन समाजातील बंधुभाव जैविक स्वरुपाचा होता.प्राचीन समाजातील देव हे विश्वात्मक नव्हते. ते त्या त्या समाजाचे होते. माणसा प्रमाणेच त्यांना राग, लोभ, मत्सर हे विकार होते.
आधुनिक समाजाच्या उदयाबरोबर देवतांची जागा सर्वात्मक ईश्वराने घेतली. ईश्वर हा समाजातीत झाला. तो अखिल मानवतेचा, सृष्टीचा नियंता झाला आणि म्हणूनच माणसाने परस्परांशी कसे वागावे याचे निर्बंधही त्याने घालून दिले. त्या निर्बंधानुसार जगणे हेच जीवनातील श्रेयस ठरले.
अशा या धर्माची चिकित्सा कोणत्या मूल्यांच्या आधारे करावयाची? सर्वच धर्म सारखेच चांगले आहेत आणि त्यात भेदभाव करण्याची गरज नाही अशी एक भूमिका तुलनात्मक धर्मशास्त्राच्या अभयासकांनी घेतली होती. आंबेडरांना ही भूमिका घातक वाटते. त्यांच्यामते या भूमिकेतून सर्वच धर्माची भलावण होण्याची शक्यता आहे. तेव्हा या भूमिकेतून धर्माची चिकित्सा समाधानकारकपणे होऊ शकत नाही.
त्या ऐवजी धर्म आणि नीतीची एकरुपता झालेल्या धर्माला त्यानेपुरस्कृत केलेल्या नैतिक ध्येयांच्या संदर्भातच प्रश्न विचारले पाहिजेत. मानवतावादी नैतिकतेच्या दृष्टीने त्या त्या धर्माची चिकित्सा केली पाहिजे. मानवतावादी नैतिकतेने ‘न्याय’ या मूल्याचा पुरस्कार केला आहे. आंबेडकर म्हणतात या न्यायाच्या कसोटीवरच धर्मचिकित्सा झाली पाहिजे. न्यायाच्या विचार म्हरजे इतरांचा विचार हा समतेचा विचार आणि इतर आपल्या प्रमाणेच असतील तर आपल्या सारखेच इतरांनाही स्वातंत्र्य हवे असा त्यांचा विचार त्यात होतो. म्हणजेच न्याय हे मूल्य मानले तर स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये त्यात येतात. म्हणून बाबासाहबे या मूल्याच्या आधारेच म्हरजेच पर्यायाने स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्याच्या आधारे धर्माचे तत्वज्ञान, धर्मसंस्था व तिचा व्यवहार याची चिकित्सा सुरू करु इच्छीतात. आंबेडकरांची ही भूमिका उपयुक्तवादी नाही.
हिंदुधर्माची समीक्षा – आंबेडकरांच्या धर्मचिंतनातील दुसरा महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी केलेल्या हिंदू धर्माची समीक्षा होय. हिंदूधर्म हे एक मोठे कोडे आहे. Riddles in Hindunismमध्ये हिंदू म्हणून एकाद्यास ओळखणे हे कसे गुंतागुंतीचे वकठिण काम आहे. याचा उहापोह बाबासाहेबांनी पहिल्या टिपणात केला आहे. पण असे असले तरी इर्मशास्त्रांना प्रवर्तीत केलेला धर्म या अर्थाने हिंदू धर्म हाही एक स्वत:ची स्वतंत्र मूल्यदृष्टी असलेला, त्यानुसार समाजाची धारणा करणारा, समाजाचे नैतिक नियमन करणारा, यहुदी, इस्लाम वा ख्रिश्चानिटीप्रमाणेच ‘पॉझिटिव्ह रिलीजन आहे.’ अशी आंबेडकरांनी भूमिका घेतली आहे. हिंदू धर्म हा सनातन धर्म आहे अशी न्या.रानडे, गांधी, विनोबा यांनी भूमिका घेतलेली आहे. आंबेडकरांनी सनातन धर्म आणि ‘प्रवर्तित धर्म’ अशी वर्गवारी केली आहे.
अशा अवस्थेत ‘सनातन’ म्हणून घेणाऱ्या धर्माचा नेमका गाभा कोणता, त्याची व्यवच्छेदक लक्षणे कोरती हे सांगणे अवघड होऊन बसते. त्यामुळे हिंदु धर्म हा सनातन धर्म आहे असे म्हणणाऱ्यांबरोबर अर्थपूर्ण चर्चा, युक्तिवाद करणे अवघड बनते. आंबेडकरांनी या आपत्तीतून सर्वांनाच सोडवले आहे. तयांनी हिंदू धर्म हा ख्रिस्ती व इस्लाम धर्माप्रमाणेच प्रवर्तित’ धर्म आहे हे प्रथम प्रस्थापित केले.
परिणामत: माणसामाणसातील हार्दिकता नष्ट होते. माणसे भौगोलिकदृष्ट्या जवळ येतात. पण मनाने परस्परांपासून दुरावली जातात. राष्ट्रभावना ही मुळातच नकारात्मक असल्याने केवळ आपत्तीच्या प्रसंगीच ती परस्परांबद्दलचा जिव्हाळा, ऐक्यभाव निर्माण करते एरवी समाजातील क्षुद्र हितसंबंध बंधुत्वावर नेहमीच मात करीत असतात. जमातवाद, प्रदेशवाद, जातिवाद, भाषावाद, वंशवाद हा नित्याचा अनुभव बनतो, दंडशक्तीच्या बलावर ऐक्य टिकवण्याच्या प्रयत्नास अंगभूत मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत परात्म झलेल्या व्यक्तीस बंधुत्वाचा, सहोदरत्वाचा प्रत्यय येणार कसा? त्यासाठी उच्च नैतिक पुरस्कार करणारा धर्म हवा. आंबेडकरांना तो बुध्द विचारात सापडला.
बुध्दविचार विवेक स्वातंत्र्य सांगतो, समता सांगतो. भ्रातुभाव सांगतो. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही आधुनिक नागरी समाजाची मूल्यत्रयी बुध्दाने कधीच घोषित केली आहे. पण बुध्द तिथेच थांबत नाही. तो करुणा, प्रज्ञा, मअत्री वशील याही मूल्यांचा उदघोष करतो. तो ब्राम्हणधर्माप्रमाणे निव्वळ हिंसाप्रधान नाही तसाच तो जैनधर्मीयांप्रमाणे अतिरेकी अहिंसेचाही पुरस्कार करीत नाही. बुध्द हा परलोक नाकारतो म्हणून तो ऐहिक आहे. तो प्रज्ञास्वातंत्र्य सांगतो म्हणून सांप्रदायिक नाही. तो ‘दु:ख’ म्हणजे दारिद्र्य विषमता आणि म्हणूनच शोषणाच्या विरोधात आहे.
शोषणमुक्त समाजाचे ध्येय ज्या प्रागतिक विचारधारांनी स्वीकारले त्यांना बुध्दस्वीकारावाच लागेल. याच संदर्भात मार्क्सवादाचे शोषणमुक्त समाजाचे व सुखी समाजाचे नैतिक ध्येय आणिबुध्दाचे दु:ख निवारण्याचे नैतिक ध्येय हे सारखेच आहे असे आंबेडकर ‘बुध्दा ऑर कार्लमार्क्स’ या त्यांच्या भाषणात सांगतात. आधुनिक भांडवलशाही व्यवस्थेने निर्माण केलेल्या शोषण, चंगळवाद, हिंसा, दारिद्रय, विषमता या सर्व दुखण्यांच्या विरोधात मार्क्स उभा राहिला. भारताील बुध्दविचारही या दुखण्यांच्या विरोधोत उभा राहू शकातो हा आंबेडकरांचा दृढ विश्वास होता.
म्हणूनच बुध्दाला मार्क्सचा पर्याय म्हणून ते उभा करीत नाहीत तर मार्क्सचा सहोदर म्हणून उभा करतात. आज नागरी समाज, राष्ट्र राज्य, याही पलीकडे जाऊन कम्यूनिटॅरिअन समाजाची’ स्वप्ने आपण पहात अहोत. आधुनिक सामाजातील दुखण्यांवर आपण उपाय शोधत आहोत. मार्क्सने सांगितलेल्या Classless Society चा प्रयोग झाला लोकशाहीच्या कल्याणकारी राज्याचा प्रयोग झाला.
Small is Beautiful चे युरोपमध्ये प्रयोग चालू आहेत. गांधींच्या ग्रामराज्याचा विचारच जिथे इथल्या बुध्दीजीवी वर्गास समजला नाही तिथे policy makers तो काय म्हणून राबवणार. या संदर्भात आंबेडकरांचा ‘धम्म’ विचार हा कम्यूनिटॅरिअन समाजाला ब्लू प्रिंट होऊ शकतो. पण तो धर्माच्या प्रांगणातून सामाजिक व राजकीय आखाड्यात उतरला पाहिजे. देशाच्या परिवर्तनवादी राजकारणाच्या ऐरणीवर उच्चरवात मांडला गेला पाहिजे. तरच आंबेडकरांचे धर्मचिंतन मुक्तीवादी राजकरणाचे हत्यार म्हणून वापरता येईल अन्यथा येथील मोक्षवाले त्याच्याच आधारे स्वत:च्याच मुक्तीचा विचार करण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत.